प्रत्यक्षात काम न करता घरी बसून फुकटचा पगार उचलणाऱ्या २९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेने कामाला जुंपले आहे. शिवाय आणखी ‘घरकोंबड्या’ कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. यासोबतच कामचुकारपणा करणाऱ्या सुमारे ५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या पथकाकडून शहरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करून मुल्यमापन केले जाणार आहे. या मुल्यमापनात महापालिकेला चांगले गुण मिळावेत यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींमार्फत प्रयत्न केले जात आहेत. मनपा आयुक्त, महापौर, वरिष्ठ अधिकारी दररोज स्वच्छतेच्या कामाची पाहणी करीत आहेत. स्वच्छतेच्या कामासाठी सुमारे १६०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यापैकी काही कर्मचारी प्रत्यक्षात कामावर न येता फुकटचा पगार उचलतात, असे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या लक्षात आले. त्यांनी या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख उपायुक्त अय्युब खान यांनी पुढाकार घेऊन ‘घरकोंबड्या’ कर्मचाऱ्यांचा शोध घेतला. काम न करता पगार घेणारे २९ कर्मचारी आतापर्यंत सापडले आहेत. त्यांना कामावर येण्यास भाग पाडण्यात आले. दरम्यान, ‘घरकोंबड्या’ कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचा शोध स्वतंत्र यंत्रणेमार्फत घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत काम करणे अनिवार्य आहे. पण, अनेक कर्मचारी तीन किंवा चार तास काम करून पोबारा करतात. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांचा देखील घनकचरा व्यवस्थापन कक्षातर्फे शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त कामचुकार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना शंभर रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतचा दंड ठेठावण्यात आला आहे.
घरकोंबड्यांची कार्यपद्धती
साफसफाईच्या कामात वर्षानुवर्षे काम केल्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे लोकप्रतिनिधी, कामगार नेते, अधिकारी यांच्याशी सुत जुळलेले असते. त्याचा उपयोग करून हे कर्मचारी साफसफाईच्या कामावर प्रत्यक्ष जात नाहीत. घरीच बसतात, त्यांचे अन्य व्यवसाय सुरू असतात. काम न करता त्यांना दर महिन्याचा पगार मात्र नियमित मिळतो. घरी बसून काम करण्याची त्यांची ‘कार्यपध्दती’ पालिकेत चर्चेचा विषय असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. प्रथमच कारवाई करीत पालिका आयुक्तांनी घरकोंबड्यांना सफसफाईच्या कामासाठी बाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आश्रयदाते कोण ?
काम न करता घरी बसून काम पगार घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आश्रयदाते कोण, असा सवाल आता विचारला जात आहे. विशिष्ट नेत्यांच्या आडून काही स्वच्छता निरीक्षकांना हाताशी धरले जाते. हजेरी लावण्यास त्याला भाग पाडले जाते. कामावर न येता हजेरी लावण्याचा मोबदला म्हणून तीन ते पाच हजार रुपयांची बिगादी दिली जाते. या बिदागीचे दोन-तीन टप्प्यात वाटप होते. ही बिदागी देणारे आणि घेणारे कोण याचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे घरकोंबड्यांचे आश्रयदाते येत्या काळात उघडे पडतील, असे मानले जात आहे.
मटा भूमिका
दुरुपयोग थांबवा
महापालिकेत चमत्कार नित्याचेच झाले आहेत. एकीकडे सर्वच खात्यांमध्ये मनुष्यबळ कमी आहे आणि दुसरीकडे काही लोकांना घरी बसून पगार दिले जात आहेत! अशा आयतोबांना आज कामाला जुंपले गेले, पण त्यांनी ज्यांच्या छत्रछायेत बसून इतके महिने आराम केला त्यांचे काय? मध्यंतरी काही स्वच्छता कामगारांनी आपले काम करण्यासाठी पगारी नोकर नेमल्याचाही प्रकार उघडकीस आला होता. कोणीच प्रामाणिकपणे लक्ष न दिल्यामुळे परिस्थिती इतकी रसातळाला गेली आहे. काही स्वच्छता कामगार मात्र रात्रंदिवस परिश्रम घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. कामचुकारांवर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टींना राजकीय किनार आहे. ती उधळून अधिकाऱ्यांनी कारवाई करावी आणि करदात्यांच्या पैशाचा दुरूपयोग थांबवावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट