Ravindra.Taksal@timesgroup.com
Tweet : @rtaksalMT
२५ जानेवारी २०१६. सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत असतानाच टेबलवरील फोन खणखणला. कर्मचाऱ्याने फोन उचलला, ‘जय हिंद’ म्हणत नाही तोच फोन करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याने देवळाई परिसरात वन विभागाच्या जमिनीवर मृतदेह सापडल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत कर्मचाऱ्याने तातडीने थोरात यांना माहिती दिली. थोरात यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. साई टेकडीजवळ शासकीय वाहन पोचले. पुढे वाहनाने जाणे शक्य नव्हते. वन विभागाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सर्वजण अर्धा किलोमीटर पायीच घटनास्थळापर्यंत गेले. तेथील दृश्य मन हेलवणारे होते. साधारणपणे २० ते २५ वयोगटातील तरुणाचा तो मृतदेह होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केल्याच्या खुणा होत्या. काळा टी-शर्ट, जीन्स पॅन्ट आणि पायात चप्पल असलेल्या त्या तरुणाला जाळण्याचा प्रयत्नही मारेकऱ्यांनी केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
थोरात व त्यांच्या पथकाने परिसरात सर्च करत अन्य काही पुरावे, वस्तूचा शोध घेतला, पण हाती काही लागले नाही. ओळखपत्र वा अन्य कोणतीही वस्तू न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविणे अवघड होते. पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केल्यानंतर टी-शर्टवर ‘हिवाळे ग्रुप’ अशी छापील अक्षरे दिसून आली. त्या अनुषगांने पोलिसांनी पुढील तपासचक्रे फिरवली. हिवाळे लॉन्सचे संचालक नाना हिवाळे यांच्याकडे विचारणा केली. गणेशोत्सव काळात हिवाळे यांनी तीनशे ते चारशे जणांना अशी टी-शर्ट दिल्याचे समोर आले. त्यांनी स्वतः मृतदेहाची पाहणी केली, पण ओळख पटली नाही.
मृत तरुण हा सातारा, देवळाई, गारखेडासह कचनेर, शिवगा तांडा आदी परिसरातील असावा, अशी शक्यता गृहीत धरत शहर पोलिसांसह तेथील खबरे, पोलिसमित्र आदींना माहिती देण्यात आली. शहर पोलिसही घटनास्थळी आले. जवाहरनगर, मुकुंदवाडी, एमआयडीसी सिडको, सातारा पोलिसांना मृताचा फोटो पाठविण्यात आला. त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून कुणी तरुण बेपत्ता (मिसिंग) आहे का, याचा शोध सुरू झाला. पंचनामा झाल्यानंतर दुपारी मृतदेह घाटीत पाठविण्यात आला. पोलिस नाईक बापुराव चव्हाण यांनी शासनातर्फे फिर्याद दिली, त्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, तत्कालीन अप्पर अधीक्षक श्रीधर, उपअधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. मृत तरुण कोण, खून कोणी व का केला या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम सुरू झाले. सायंकाळी प्रिया थोरात यांना बंदोबस्तासाठी शेंद्रा परिसरात जावे लागले. तेथे मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमधून त्यांना फोन आला. मुकुंदवाडी परिसरातील एक मुलगा मिसिंग आहे, त्याच्या पालकांना पाठवतो, असा निरोप अधिकाऱ्यांनी दिला.
धागेदाेरे हाती येण्याची शक्यता वाढल्याने थोरात यांनी वरिष्ठांना माहिती देत तातडीने पोलिस स्टेशन गाठले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास भेदरलेल्या अवस्थेत एक महिला त्यांना भेटण्यासाठी आली. एकुलता एक असलेला मुलगा २३ जानेवारी रोजी सायंकाळी घराबाहेर गेला, पण तो परत आला नाही, असे ती सांगत होती. त्या महिलेस शांत करत तपास अधिकाऱ्यांनी मुलाचे वर्णन, कपडे याबाबत विचारणा केली. मृतदेहाच्या वर्णनाशी ते मिळते-जुळते होते. त्या महिलेला मृतदेह कसा दाखविणार, असा प्रश्न पडल्याने पोलिसांनी तिच्या पतीबाबत विचारणा केली. ते चिकलठाणा येथील एका कंपनीत नोकरीस असल्याचे समजताच पोलिसांनी कंपनीत जाऊन त्यांना तेथून ठाण्यात आणले. दोघेही खूप भेदरलेले होते. पोलिसांनी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. थोड्या वेळाने त्यांना मृतदेहाचे कपडे व मृतदेह दाखविण्यात आला. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच ते पालक हादरून गेले. त्यांचे सांत्वन करत पोलिसांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
मृतदेह हा राहुल बाळू लाडंगे (वय १९, रा. अंबिकानगर) यांचा असल्याचे समोर आले. राहुल हा सिडको परिसरातील एका कॉलेजात बारावीत शिकत होता. पॉकेटमनीसाठी तो केटरिंगच्या कामासाठी जात असे. त्याचा मोबाइल क्रमांक; तसेच त्यांचे कुणाही वैर होते का, मित्र कोण आदी माहिती घेत पोलिसांनी तपासाची पुढील दिशा ठरवली.
गुन्हा दाखल होऊन दुसरा दिवस उजाडला. तोपर्यंत पोलिसांचा सर्व दिशांनी तपास सुरू झाला होता. कॉलेज व परिसरातील सखोल चौकशीत प्रेमप्रकरणातून हा खून झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच दरम्यान तांत्रिक साधनांच्या मदतीने व खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून काही महत्त्वाचे धागेदारे पोलिसांच्या हाती आले आणि उमेश बबन चव्हाण (वय २०) व सचिन आत्माराम चंदनशिव (वय २०, दोघे रा. मुकुंदवाडी) या संशयितांचा शोध सुरू झाला. दोघे आपापल्या घरी असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.
...म्हणून केला खून
राहुल, उमेश व सचिन हे तिघे मित्र. त्यात राहुल व उमेश यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत. त्यातूनच उमेशच्या मनात राहुलविषयी अढी निर्माण झाली आणि त्यातूनच त्याने सचिनच्या मदतीने राहुलचा खून केल्याचे तपासात समोर आले. तशी कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. २३ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास उमेश चव्हाण व सचिन चंदनशिवे यांनी राहुलला फिरायला जाण्यासाठी बोलावून घेतले. तिघे मुकुंदवाडी परिसरातून रिक्षाने साई टेकडीकडे निघाले. रस्त्यात उमेश व सचिन यांनी मद्यप्राशन केले. साई टेकडी येथे सायंकाळी ते पोहचले. त्यांनी रिक्षा सोडून दिली. त्यानंतर राहुलने साईदर्शनाचा आग्रह धरला, पण त्या दोघांनी आपण फिरून येऊ, असे म्हणत त्याला पायी निर्जनस्थळी नेले. तेथेही त्यांच्यात वाद झाला. जवळपास कुणी नसल्याची खात्री करून राहुलवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यांनी छोट्या बाटलीत रॉकेलही आणले होते. मृतदेह पेटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्नही त्यांनी केला. राहुलचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळ काढला. राहुलचा मोबाइल टेकडीजवळील एका खदानीत फेकून दिला. चाकू दुसऱ्या खदानीत, तर रॉकेलची बाटली बाळापूर रस्त्यावरील एका विहिरीत फेकल्याचे तपासात समोर आले. राहुलचा मोबाइल व अन्य वस्तू खदानीतून काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची मदत घ्यावी लागली. तपासांती पोलिसांनी कोर्टात दोषारोपत्र सादर केले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तपास अधिकारी थोरात, कर्मचारी शकील शेख, जनार्दन भुरमे, देविदास सास्ते, संदीप जाधव, अर्जुन राठोड, आवेज शेख यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कांचन चाटे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट