म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान बालक व गरोदर मातांच्या पोषण आहारात मोठा घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे. बचत गटाकडून निकृष्ट गहू व धान्याचा सर्रास वापर केला जात आहे. गव्हात किड्यासह काड्या व कचरा असलेला गहू मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. महिला व बालविकास विभागाममार्फत नेमण्यात आलेले हे बचतगट बालकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
राज्यातील अंगणवाडी व गरोदर स्त्री आणि स्तनदा मातांना महिला व बाल विकास विभागामार्फत पोषण आहार योजनेतंर्गत गव्हापासून बनवलेले पदार्थ दिले जातात. मात्र, या पोषण आहारासाठी वापरला जाणारा गहू हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले असून या गव्हात किडे, काड्यासह अन्य कचरा आहे. अत्यंत निकृष्ट असलेला हा गहू किडे व कचरा काढून नंतर त्यापासून पोषण आहार बनवला जातो. उस्मानाबाद जिल्ह्यातील एमआयडीसी भागात असलेल्या योगेश्वरीदेवी महिला बचत गटाच्या पोषण आहार निर्मिती केंद्रावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. किडे लागलेला निकृष्ट गहू पोषण आहारासाठी वापरला जात आहे. यावेळी येथे काम करणाऱ्या एका कामगाराने गव्हातून किडे काढून नंतर ते गहू भाजून त्यापासून पोषण आहार बनवला जात असल्याचे सिकंदर हातगळे यांनी सांगितले. जनावरे सुद्धा खाणार नाहीत असा हा गहू पोषण आहारासाठी बचत गट वापरत असून लहान बालक व गरोदर मातांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार सुरू आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ११ महिला बचत गट हे पोषण आहार तयार करण्याचे काम करीत असून त्यांना दर महिन्याला यासाठी सुमारे एक कोटी रुपये दिले जातात. यातील अनेक प्रकल्प बंद अवस्थेत असून त्यांच्या नावाने कारभार चालतो.
पोषण आहाराच्या नावाखाली बचत गटांना कोटयावधी रुपयाची खैरात दिली जात असून यामध्ये शासकीय अधिकारी सुद्धा गुंतले आहेत. बचत गटांना केंद्र सरकारचे भारतीय खाद्य निगम दोनशे रुपये क्विंटल म्हणजे दोन रुपये दराने गहू देते. मात्र, हा गहू निकृष्ट असतो शिवाय यातील फक्त ५० टक्के गहू हा चाळून वापरता येतो असे अधिकारी सांगत आहेत. मात्र, इतकी गंभीर बाब असतानाही कोणताही अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही.
याप्रकरणी शिंगोली गावात एक भयाण वास्तव समोर आले. या गावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या महेश व अथर्व लोंढे या दोन बालकांना दरमहा प्रत्येकी चार पिशवी पोषण आहार मिळतो. मात्र, एकदा या आहारात खडे व कचरा निघाल्याने कोणीही हा आहार खात नाही हा आहार जनावरांना टाकला तर जनावरे सुद्धा तो आहार खात नसल्याचे त्यांची आजी पद्मिनी लोंढे व आई काजल लोंढे यांनी सांगितले.
महिला व बालविकास विभागातील अधिकारी बचत गटाशी संधान साधून या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत लाखो रुपयांचा अपहार करीत आहेत. त्यामुळे या प्रकाराची पोषण आहाराच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या शीला उंबरे यांनी केली आहे.
कारवाईकडे सर्वांचे लक्ष
पोषण आहार हा पोषक आहे की नाही हे तपासण्याची कसलीही यंत्रणा जिल्हा पातळीवर नसल्याने बचत गटावर कोणाचाही अंकुश राहिलेला नसल्याचे दिसत आहे. बचत गटाच्या या निकृष्ट धान्य घोटाळ्यानंतर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट