पैठण तालुक्यामधील ११ लिलाव न झालेल्या वाळूपट्ट्यातून चोरी रोखण्यासाठी चारचाकी मालवाहू वाहने जाण्यास बंदी घालावी, असा प्रस्ताव पैठण तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. वाळूघाटांवर वाहनांना प्रतिबंध करून वाळू चोरी रोखता येईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
गेल्या वर्षभरापासून वाळूतस्करांनी वाळूठेका न घेता सर्रास चोरी करून वाळूविक्री करण्याचा फंडा सुरू केला आहे. पैठण तालुक्यातील १२ वाळूपट्ट्यांपैकी ११ पट्ट्यांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होते. या वाळूपट्ट्यातून रात्री ट्रक, एलपी ट्रक, हायवा, ट्रॅक्टर, आयशर टॅम्पो, लोडिंग रिक्षांमधून सर्रास वाळू चोरी केली जातो. या संदर्भात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत, मात्र कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशासनाला वाळू तस्करांकडून अरेरावीची भाषा, शिवीगाळ करण्यात येऊन धमकी देण्यात येते. अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही तालुक्यात झाले आहेत. वाळूचोरी रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक गेल्यानंतर पथकाच्या मागावर असलेले तस्करांचे लोक पथकाचे लोकेशन देतात यामुळे चोरी रोखणे अवघड झाले आहे. अनधिकृत वाळू उत्खननामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व मालवाहतूक करणाऱ्या वाहनास त्या परिसरात बंदी घालून शासनाचे नुकसान थांबवता येईल. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्यासाठी ११ वाळूपट्ट्यात ट्रक, एलपी ट्रक, हायवा, ट्रॅक्टर, टॅम्पो, लोडिंग रिक्षा तसेच वाळू वाहतूक करू शकणाऱ्या सर्व वाहनांवर प्रतिबंध घालण्यासाठी संहिता १९७३ चे कलम १४४ (१) नुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव पैठणचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे.
लिलाव न झालेले वाळूपट्टे
नवगाव, पाटेगाव, वडवाळी, नायगाव भाग १, नायगाव भाग २, आपेगाव, मायगाव, दादेगाव जहांगीर, हिरडपुरी, टाकळी अंबड व आवडे उंचेगाव येथील वाळूपट्ट्यांचा लिलाव झालेला नाही. या वाळूपट्ट्यांमध्ये मालहवाहू वाहने जाण्यास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट