पतीसह सासरच्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीला एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी शुक्रवारी (१० मार्च) ठोठावली.
या प्रकरणी मृत विवाहिता माया हिची आई सिंधुबाई इंगळे (४०, रा. प्रबुद्ध नगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, विवाहिता माया यांचा विवाह आरोपी शरद पवार (२६, रा. मूळचा बुलडाणा, हमु प्रगती कॉलनी, औरंगाबाद) याच्याशी २६ मे २००९ रोजी झाला होता. लग्नानंतर हुंडा कमी दिला, मानपान केले नाही आदी कारणांवरून पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक-मानसिक छळ केला जात होता. पतीकडून तिला वारंवार मारहाण केली जात होती. खाऊ-पिऊ दिले जात नव्हते. शेवटी सततच्या छळाला कंटाळून विवाहिता माया हिने ४ डिसेंबर २०१० रोजी राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पती शरद पवार, सासू, नणंद, दिराविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये कलम ४९८ (अ), ३०४, ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सुनावणीवेळी, दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा टोठावली. तर, सबळ पुराव्याअभावी इतर तिघांची मुक्तता करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट