म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे शुक्रवारी वैजापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार आर. एम. वाणी यांनी केले.
शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी दहा वाजता निघून निदर्शक तहसील कार्यालयापर्यंत गेले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार आर. एम. वाणी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश पाटील बोरनारे, संजय पाटील निकम, महिला आघाडीच्या आनंदी अन्नदाते यांनी भाषणातून शेतकऱ्यांची कैफियत मांडली. राज्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी व नापिकीची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेतले आहे. परंतु, दुष्काळी परिस्थिती व शेतीमालाला भाव नसल्याने कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. त्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गेल्या अडीच वर्षांत राज्यातील ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदार सुमन मोरे यांना देण्यात आले. निवेदनावर माजी नगराध्यक्ष साबेरखान, अॅड. आसाराम रोठे, बाजार समिती सभापती काकासाहेब पाटील, बाबासाहेब जगताप, राजेंद्र चव्हाण, रामहरी जाधव, अॅड. आर. डी. थोट, सुलभा भोपळे, नंदकुमार शिंदे, रमेश पाटील सावंत, प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, पार्वतीबाई जाधव, मनाजी मिसाळ, साहेबराव औताडे, अनिल आल्हाट, एल. एम. पवार, अंकुश हिंगे, अकिल शेख, पंचायत समिती सदस्य माया होले, सुनीता बागुल, सुषमा वाघ, रवींद्र कसबे, माधुरी गलांडे, कल्पना डांगे यांच्या सह्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट