स्पर्धा परीक्षेत एका-एका गुणसाठी जीवघेणी स्पर्धा असते. अशावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रविवारी झालेल्या पूर्व परीक्षेत भाषांतर व उत्तरातील पर्याय चुकल्याचा आरोप परीक्षार्थिंनी केला आहे. त्यामुळे ४ गुण जाण्याची चिंता परीक्षार्थींना पडली आहे.
एमपीएससीतर्फे रविवारी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार पदासाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षा, निकालात वेळापत्रक पाळले जात नसल्याचा आधीच आरोप आयोगावर आहे. त्यात कालच्या परीक्षेत दोन प्रश्न चुकल्याचे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासकांना वाटते. त्याबाबतची तक्रारही देण्याची प्रक्रिया विद्यार्थी करत आहेत. या परीक्षेत ‘बी’ संच प्रश्नपत्रिकेत प्रश्न ११मध्ये ‘सन २००९ मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करणाऱ्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी अहवाल कोणी सादर केला?’ असा प्रश्न आहे. त्याचे चार पर्याय देण्यात आले. मराठीत डॉ. विजय केळकर, तर इंग्रजी भाषांतरात डॉ. विजय तेंडुलकर असा पर्याय दर्शविण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक ४९ ‘भारतीय राज्यघटनेवर २६२नुसार आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीचा तंटा सोडविण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला की राष्ट्रपतींना?’ असा आहे. या प्रश्नाला दिलेल्या चार पर्यायांपैकी पर्याय क्रमांक १ व ४ दोन्हींचा अर्थ समान आहे. या प्रश्नांतील पर्यायांमुळे विद्यार्थी गोंधळात पडले. प्रश्नपत्रिका काढताना भाषातंराच्या चुका, त्रुटी त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक गोंधळात टाकतात व गुण कमी होतात, असा आरोपही विद्यार्थी करत आहेत.
प्रश्नपत्रिकेत दोन चुका या विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांनी सांगितले, की प्रश्नपत्रिका पाहिली की ही चूक लक्षात येते. हे प्रश्न ४ गुणांसाठी आहेत. अशा परीक्षांना लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे स्पर्धा प्रचंड असते. अशावेळी अधिकाधिक पारदर्शकता असणे महत्त्वाचे आहे. अशा चुका विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चिकरण करणाऱ्या ठरतात.
- प्रा. प्रशांत साठे, बार्टी, औरंगाबाद.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट