रमाई घरकुल बचाव संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या समोर निदर्शने केली. ही योजना महापालिकेतर्फे योग्य प्रकारे राबवली जातनसल्याची समितीच्या सदस्यांची तक्रार होती.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत नवीन घरकुलांसाठीचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करावी. ज्या लाभार्थीने घरकुल मागणीचा अर्ज केला आहे त्याचे नाव घरकुलासाठी समाविष्ट करून प्रत्येक महिन्याला अशा प्रकरणांना मंजूरी देण्यात यावी. घरकुल अनुदानाचे तीन टप्प्यांत विभाजन करावे. अनुदान तुटपुंजे असल्यामुळे त्यात वाढ करावी. घरकुल कक्षप्रमुखपदी अभियंत्याची नियुक्ती करावी. दर महिन्यात कामाच्या प्रगतीनुसार अनुदानाचे वाटप करावे. औरंगाबाद शहरात जागेची अडचण असल्यामुळे नवीन अध्यादेशानुसार वाढीव चटईक्षेत्र रद्द करावे, अशा मागण्या या समितीतर्फे करण्यात आल्या. आयुक्तांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनावर मधुकर ढेपे, अरविंद कांबळे, अण्णा दाभाडे, लक्ष्मण कांबळे, आशिष गायकवाड, ज्ञानेश्वर खरात, उद्धव गडवे, सुधाकर भिसे, बाळू गणकवार, राजू जाधव, संदीप मगरे आदींची नावे आहेत. आयुक्त नसल्यामुळे या नागरिकांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.
भजे-पावचा नाष्टा
आयुक्तांना निवेदन देण्यासाठी कृती समितीचे सदस्य महापालिकेत आले होते, पण आयुक्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ते उपायुक्तांची वाट पहात त्यांच्या दालनाच्या बाहेर बसले. उपायुक्त स्थायी समितीच्या बैठकीत होते. बैठक बराचवेळ चालली. त्यामुळे कृती समितीच्या भुकेल्या सदस्यांनी तेथेच भजे-पाव आणून नाष्टा केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट