म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रूंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यालगत असलेल्या सुमारे १७५ झाडांची कत्तल न करता त्याऐवजी सर्व्हिस रोडच्या धर्तीवर रूंदीकरण करावे, अशी मागणी इको नीडस् फाऊंडेशनने केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
औरंगाबाद-पैठण रोड हा सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. वाहनांची संख्या जास्त व रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावरील महानुभाव आश्रम चौक ते वाल्मी यादरम्यान रस्ता रूंदीकरण करण्याचे नियोजन संबंधित विभागाने हाती घेतले. मात्र, या रूंदीकरणामुळे रस्त्यालगत असलेले सुमारे १७५ जुने वृक्ष अडथळा ठरत असून ते हटविण्यात येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ही वृक्ष वाचविण्यासाठी इको नीडस् फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनिषा जाघन, सचिव रोहित थोरात, अत्तदीप आगळे, अॅड. विनय सरवदे, अॅड. नीलेश दंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
रूंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल चुकीचे ठरेल. त्याऐवजी हे रूंदीकरण सर्व्हिसरोडच्या धर्तीवर करावे, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे, त्यामुळे वृक्षाचे संवर्धन होईल, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. ही झाडे रस्त्याच्या दुभाजक क्षेत्रात घेऊन दुभाजकांच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण करावे, अशी मागणी करत अशा पद्धतीने रस्ता रुंदीकरणाचा आराखडा फाऊंडेशनकडे तयार असल्याचे सांगितले.
या झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण प्रस्तावित असेल तर सर्व कायदे, निर्देशांचे पालन करूनच पुढील कारवाई व्हावी, कोणत्या पद्धतीने व प्रक्रियेने वृक्ष पुनर्रोपन केले जाईल, त्याची माहिती जनतेला व्यापक स्वरुपात द्यावी यासह अन्य मागण्या फाऊंडेशनने केल्या आहेत.
नागरिकांनी पुढाकार घ्यावा
पैठण रोडवरील झाडे जुनी व मोठी आहेत. ही झाडांची कत्तल नसून मानवी पिढीच्या भविष्याची कत्तल होईल. त्यामुळेच वृक्ष कत्तल थांबविण्यासाठी नागरिकांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन फाऊंडेशन केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट