म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट