‘स्वातंत्र्यपूर्व काळात, जिल्हा परिषदेप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड असायचे. त्यात महिलेची एकच जागा. काँग्रेसच्या तिकिटावर आई निवडून आली. डीएलबीच्या पहिल्या सभेच्या चार दिवसांपूर्वीच आई बाळंत झाली. शिस्त पाळण्यासाठी आई पुण्याला सभेसाठी हजर राहिली. यावेळी अध्यक्षांनी कौतुक करत इतरांना आदर्श घेण्याचे सांगितले. आपल्यासोबत घेऊन गेलेल्या त्या चार दिवसांच्या पोराचं नाव शरद पवार...,’ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी औरंगाबादेत जीवनपट उलगडला.
मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार शरद पवार यांना ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर ग्रंथासाठी ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठी रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी डॉ. जब्बर पटेल यांना नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पवार यांनी राजकीय, सामाजिक जीवनातील किस्स्यांनी कारकिर्दी मांडली. पवार यांना ऐकण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह तुडूंब भरले होते. कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते मधुकर अण्णा मुळे, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. मनोहरराव जाधव, डॉ. दिलीप घारे, कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, ना.धों. महानोर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
‘मसाप’तर्फे मला पुरस्कार देण्यात येतो. तोही साहित्यासाठी, हे आगळं वेगळं आहे. पुरस्कारामुळे आणखी काही लिहावं, असे वाटतेय. असे सांगत पवार यांनी राजकीय व सामाजिक जीवनात किस्से सांगितले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, मुंबई या भागातील मराठी भाषा आणि लोकांचे स्वभावगूण त्यांनी एकेका किस्स्यांतून सांगितले. डॉ. जब्बार पटेल यांनी, पुस्तकदिनी पुरस्कार
मिळाला हे महत्त्वाचे अाहे. मी कायम हौशी, प्रायोगिक रंगभूमीवर रमलो, असे सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार व आपली मैत्री; तसेच घाशीराम कोतवाल नाटकाला झालेला विरोध, सामना या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी पवार यांनी उपलब्ध करून दिलेली इमारत आदींच्या आठवणी सांगितल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट