जिल्ह्यातील ऑनलाइन सातबाऱ्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या १ मेपासून सातबारा ऑनलाइन मिळणार आहे, मात्र शहर पसिरात असलेल्या ७४५ गटांमध्ये मूळ दस्तऐवज ऑनलाइन करणे बाकी आहे. त्यामुळे या गटांतील सातबारा तूर्त ऑनलाइन पद्धतीने मिळणार नाहीत, अशी माहिती अपर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली.
गेल्या काही वर्षांमध्ये औरंगाबाद शहर परिसरातील हर्सूल, मिटमिटा, कांचनवाडी, करमाड, शेंद्रा या भागांत मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झाली आहे. या परिसरात जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक गटांतील क्षेत्राची जुळवा-जुळव करणे बाकी आहे. रजिस्ट्री असूनही सातबाऱ्यावर त्याच्या नोंदी करण्यात आल्या नाहीत. अशा गटांची संख्या ७४५ आहे. यामुळे या गटांची जुळवणी झाल्यावरच दस्तऐवजी ऑनलाइन करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
अप्पर तहसील कार्यालयांतर्गत शहर व परिसरातील सातारा, देवळाईचा समावेश करण्यात आलेला आहे. तहसील कार्यालयांतर्गत शहरातील ७ हजार ७९५ गट अाहेत. या गटांतील सातबारा आणि फेरफारचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरपासून सातबारा दुरुस्तीसाठी एका सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. औरंगाबाद तालुक्यात १ लाख ८२ हजार मूळ खातेदारांच्या सातबारा आणि फेरफारमधील नोंदी करण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र सर्व्हर देण्यात आल्यामुळे तालुक्याचे काम ९२ टक्केपूर्ण झाले आहे, मात्र गावातील काही गटांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. पूर्ण झालेल्या गटांमधील सातबारा मात्र १ मेपासून नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
माहिती अपलोड केल्यानंतर ऑनलाइन
हर्सूलमधील ३९४ गट, साताऱ्यातील ११३, मिटमिटा येथील ११० आणि कांनवाडीतील ४८ अशा एकूण ७४५ गटांमध्ये जुळवणी केल्यानंतरच ऑनलाइन सातबाऱ्याचे काम सुरू होईल. एक मेनंतर या गटांतील सातबाराचा उतारा हस्तलिखित स्वरुपात देण्यात येणार आहेत. गटांतील क्षेत्राची सर्व माहिती अपलोड करण्यात आल्यानंतर या भागातील सातबाराचे उतारे ऑनलाइन पद्धतीने मिळू शकतील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट