म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टाइम्स ग्रुप आणि हिरण्य फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोमवार (१ मे) सायंकाळी 'अभिजात महाराष्ट्र' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शास्त्रीय संगीताची मैफलीचा लाभ जास्तीत जास्त रसिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टाइम्स ग्रुप व हिरण्य फाऊंडेशनतर्फे या वर्षीच्या महाराष्ट्र दिना निमित्यच्या 'अभिजात महाराष्ट्र' या सायंमैफिलीत सुकन्या रामगोपाल आणि त्यांच्या दोन महिला साथीदारांचा सुश्राव्य अविष्कार औरंगाबादकरांना ऐकायला मिळणार आहे. घटम हे मातीचे प्राचीन ताल लोकवाद्य आहे. या घटमला १९ व्या शतकात कर्नाटकी संगीतात अधिकृत स्थान मिळाले आहे. ठरावीक पद्धतीनेच बनवलेल्या, भाजलेल्या मातीच्या मटक्यावर ताल धरून सुरेल संगीत निर्माण केले जाते. साथीचे वाद्य म्हणून या वाद्याची ओळख नंतरच्या काळात एक महत्वाचे वाद्य म्हणून झाली आणि त्याचे श्रेय विकू विनायकराम यांना जाते. पुरुष वाद्य अशी ओळख असणाऱ्या वाद्याला सुकन्या रामगोपाल यांनी लिलया आत्मसात केले.
हाताच्या दहाही बोटांनी घटमवर कमी-अधिक प्रमाणात वार करून सूर-ताल आणि लयीत ध्वनीत काढणे हे फार सिद्धतेचे काम आहे. घटमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करून सुकन्या रामगोपाल (घटम), रंजिनी व्यंकटेश (मृदंगम), भाग्यलक्ष्मी कृष्णा (मोर्चिंग) यांचा 'स्त्री ताल तरंग'चा लय-राग-समर्पण हा अनोखा कार्यक्रम हिरण्यच्या मॅरेज लॉन्सवर या अनोख्या वाद्याचा ताल-सूर ऐकायची पर्वणी औरंगाबादकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वांसाठी खुला असलेल्या या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन हिरण्य रिसोर्टचे संचालक सुनीत आठल्ये व मेधा आठल्ये यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट