बीड जिल्ह्यात स्त्री जन्माविषयी झालेली जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी, गरोदर मातांना झालेले समुपदेशन आदी विविध कारणांमुळे जिल्हयात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी एक हजार मुलांमागे ९२७ एवढे प्रमाण मुलींचे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. स्त्री भ्रूणहत्येचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यासाठी ही निश्चितच भूषणावह बाब म्हणावी लागेल.
बीड जिल्हा हा गेल्या काही वर्षांपूर्वी शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील मुलींच्या प्रमाणात मागे पडला होता. जिल्ह्यातील शिरूर-कासार तालुका तर देशभरात रेडझोन घोषित झाला होता. त्यातच बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या उघड झाल्या. मात्र त्यानंतर जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढावा यासाठी विभागीय स्तरावर लेक वाचवा, राष्ट्र वाचवा अभियान राबवून मोठी जनजागृती केली होती. या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करून विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. ज्याचा परिणाम मुलींचा जन्मदर वाढण्यावर झाला. सन २०१०-११ मध्ये हजार मुलांमागे जिल्ह्यात ८१० मुली होत्या. हे प्रमाण २०११-१२ मध्ये ७९७, २०१२-१३ मध्ये ८९३, २०१३-१४ मध्ये ९१६, तर २०१४-१५ मध्ये ९१३ इतके होते. २०१५-१६ मध्ये हे प्रमाणात ८९८ इतके घटले, तर आता त्यात वाढ होऊन २०१६-१७ मध्ये ९२७ इतके झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या नोंदणीनुसार २३,३८७ मुलांचा, तर २१,६८१ मुलींचा जन्म झाला आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जिल्हयात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने प्रभावीपणे केली. रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांच्या नोंदणीमध्येही मागील वर्षभरात दहा टक्क्यांची वाढ झाली. मुलींना जन्म देण्याविषयी गरोदर मातांना समुपदेशन, गावा गावात लिंग-प्रमाण दर्शविणारे फलक, प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी आदी उपाययोजनांबरोबरच आरसीएच या शासकीय पोर्टलवर गरोदर मातांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून स्त्री जन्माविषयी जनजागृती, प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीच्या जन्माचे स्वागत, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व ग्रामसभेत सांगणे, सर्व शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये, सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना, माझी कन्या भाग्यश्री योजनेची यशस्वी अंमलबजावणी याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेला प्रभावी प्रचार आदी कारणांमुळे जिल्हयात मुलींची संख्या वाढण्यास मोठी मदत झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही महिला विषयक योजनांची अंमलबजावणी संदर्भात जिल्ह्यातील यंत्रणाना निर्देश दिले. या साऱ्याचा परिपाक
म्हणून जिल्ह्यात स्त्री जन्मदारात लक्षणीय वाढ झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट