आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील जनतेने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिला. मात्र, असे असतांना मतदारांच्या मतांचा व विश्वासांचा परस्पर बाजार केलेल्या माजी मंत्री सुरेश धस यांना आता त्यांच्या आष्टी मतदार संघात येऊन चोख उत्तर देऊ असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी करत माजी मंत्री सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघावर धनंजय मुंडे यांनी आता लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी बुधवारी पाटोदा तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत त्यांनी संपुर्ण तालुका पिंजून काढला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हा परिषद गटनेते बजरंग सोनवणे, बीडचे नेते संदिप क्षीरसागर, माजी सभापती महेंद्र गर्जे, शिवाजीराव नाकाडे, अॅड. बाळासाहेब कोल्हे, विठ्ठल सानप यांच्यासह मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
वैजाळा, पाचेगांव, पाचंग्री, मंजरीघाट, अनपटवाडी, पारगांव घुमरा, जवळाला, धानोरा या गावांमध्ये सायंकाळीपर्यंत झालेल्या विविध कार्यक्रम, धावत्या भेटी या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्या दरम्यान, बोलतांना मुंडे म्हणाले, ‘यापुढे मी आष्टी मतदारसंघावर विशेष लक्ष देणार असून, परळी प्रमाणेच हा मतदारसंघही आता विकासासाठी दत्तक घेणार आहे. ज्या माजी मंत्र्यांना पक्षाने स्टार प्रचारक केले. मंत्री पदे देऊन राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यांनी सत्तेच्या स्वार्थासाठी ज्यांना मी नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पराभुत केले. त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची वेळ आली आहे. २००५ साली ही त्यांनी अशीच गद्दारी केली. त्यावेळी त्यांनी कुकडीच्या पाण्यासाठी गद्दारी केल्याचे सांगितले होते. आज कोणत्या पाण्यासाठी गद्दारी केली आहे असा सवाल मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. ज्यांच्यामुळे तुम्हाला लायकी प्राप्त झाली. त्यांच्यावर आणि बारामतीच्या नेतृत्वावर आरोप करण्याची तुमची लायकी तरी आहे का ? असा सवालही उपस्थितीत केला. आष्टी, पाटोदा नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माझ्या सभा कशा चालल्या. त्यावेळी मी चांगला आणि आजच वाईट कसा असा प्रश्न उपस्थित केला.
‘एक दिलाने काम करू’
दरम्यान, पक्षाशी गद्दारी केलेल्या सुरेश धस यांनी या मतदारसंघातील जनतेला पंधरा वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यांना आता धडा शिकवण्यासाठी आम्ही युवक एक दिलाने काम करू असा निर्धार विजयसिंह पंडित, संदिप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांनी केला.
#####################
परिवहन मंत्री रावतेंची सुरक्षा रामभरोसे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट