पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव, ४९ लाखांची तरतूद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
विमानतळाच्या प्रवेशद्वारावर ऐतिहासिक औरंगाबाद नगरी साकारली जाणार आहे. देश - विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक वास्तू व वारसास्थळांची ‘ अॅट अ ग्लान्स ’ माहिती मिळावी या उद्देशाने महत्वाच्या स्थळांच्या प्रतिकृती या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने ४९ लाख ९८ हजार ६२३ रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे.
ऐतिहासिक औरंगाबाद शहराला शासनाने पर्यटनाच्या राजधानीचा दर्जा दिला आहे. विविध ऐतिहासिक दरवाजांसह अजिंठा - वेरूळच्या लेण्या, पानचक्की, बीबी का मकबरा, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय अशा विविध वास्तू पर्यटकांना साद घालतात. या वास्तू पाहण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांना या वास्तूंची एकत्रित माहिती मिळावी या उद्देशाने विमानतळाच्या समोर भिंतीलगत विविध वारसा स्थळे व वास्तूंची प्रतिकृती तयार करून लावण्याचा हा प्रस्ताव आहे. डी.पी. डिझाईन या संस्थेचे प्रदीप देशपांडे यांनी प्रतिकृतींचे डिझाईन तयार केले आहे.
‘मटा’ला माहिती देताना प्रदीप देशपांडे म्हणाले, ‘विमानतळासाठी दोन गेट आहेत. एका गेट मधून आतमध्ये प्रवेश करता येतो, तर दुसऱ्या गेट मधून बाहेर पडण्याची व्यवस्था आहे. दोन्हीही गेटच्या बाजूला ९ मीटर बाय ९ मीटर आकाराचे खड्डे आहेत. हे खड्डे काँक्रिटीकरणाने भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खड्डे भरल्यानंतर विमानतळासाठी प्रवेश करावयाच्या गेटच्या शेजारी कैलास लेणीचा स्तंभ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आठ फूट उंचीचा हा स्तंभ असणार आहे, स्तंभाच्या बाजूने लँडस्केपिंग केले जाणार आहे. बाहेर यावयाच्या गेटच्या शेजारी पद्मपाणीची मूर्ती लावण्यात येणार आहे. सहा फूट उंचीची ही मूर्ती ‘ थ्री डी’ मध्ये तयार केलेली असेल. दोन्हीही गेटच्या मध्ये १२५ मीटरची जागा आहे. या जागेचा उपयोग विविध प्रतिकृती लावण्यासाठी केला जाणार आहे. त्यात भडकलगेट, मकईगेट, दिल्लीगेट, पानचक्की, बीबी का मकबरा, सोनेरी महल, औरंगाबाद लेणी या वारसा स्थळांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. पानचक्कीचे पाणी पडत आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी एक हौद व त्यात कारंजे तयार केले जाणार आहेत. भिंतीवरून पाणी पडत आहे, असा देखावा तयार केला जाणार आहे. प्रत्येक वास्तू केव्हा उभारण्यात आली त्याची माहिती देऊन त्या वास्तूबद्दल थोडक्यात माहिती देखील त्या ठिकाणी लावली जाणार आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची तोंडओळख शहरात पाय ठेवताच होऊ शकणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रस्ताव मंजूर केल्यावर व संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर दिल्यावर सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा संकल्प आहे.’
नियोजन समितीचा निधी
-
महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागांची चालू वर्षाची दरसूची आणि बाजारभावाचे सर्वेक्षण करून ४९ लाख ९८ हजार ६२३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हा निधी मिळवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हा नियोजन समितीने प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट