कुठल्याही मनोविकाराला सामाजिक कलंक मानणे, उपचार टाळणे, उशिरा-अनियमित उपचार घेणे, यामुळे अपरिमित नुकसान होते. त्यापेक्षा खुल्या मनाने मनोविकारांचा स्वीकार करुन तातडीने योग्य उपचार घेण्यामुळेच ‘स्किझोफ्रेनिया’सह सर्व मानसिक आजारांवर यशस्वीपणे मात करणे शक्य आहे. अत्याधुनिक उपचार पद्धतींनी ‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्त व्यक्ती पूर्वदावर येत असल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बरे होण्याची संधी चुकवू नका, असा बहुमोल सल्ला ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. विनय बाऱ्हाळे व डॉ. विनायक पाटील यांनी बुधवारी येथे ‘वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे’निमित्त दिला.
शहरातील शांती नर्सिंग होम तसेच ‘स्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान’च्या वतीने बुधवारी (२४ मे) तापडिया नाट्य मंदिरात आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते आणि त्यांना बोलते केले प्रख्यात लेखक, आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले व लेखिका नीलांबरी जोशी यांनी.
या प्रसंगी ‘शांती नर्सिंग होम’चे संचालक डॉ. बाऱ्हाळे व डॉ. पाटील म्हणाले, विचार, भावना व वर्तणूक पुरती बिघडवून टाकणारा, विस्कळीत करणारा स्किझोफेनिया हा गंभीर मानसिक विकार आहे. त्याला विचारांचा विकार असेही म्हटले जाते. यामध्ये मेंदूचे कार्य बिघडते व त्याचे अनेकविध परिणाम दिसून येतात. संगोपनातील दोषांसह अनुवंशिकता, ताणतणाव, मेंदुला होणाऱ्या दुखापतींमुळे ०.५ ते १ टक्के व्यक्तींमध्ये हा मनोविकार सर्रास सर्वत्र सर्व जात-धर्म-व्यक्तींमध्ये दिसून येतो. एका पालकास स्किझोफ्रेनिया असेल तर, अपत्यास हा आजार असण्याची शक्यता १२ टक्क्यांनी वाढते, तर दोन्ही पालकांना स्किझोफ्रेनिया असल्यास अपत्यास हा आजार असण्याची शक्यता ४० टक्क्यांनी वाढते. त्यातच २० ते ३० या वयोगटामध्ये हा आजार सर्वाधिक प्रमाणात दिसून येतो. अर्थात, अत्यल्प प्रमाणात मुलांमध्येही ‘चाइल्डहूड स्किझोफ्रेनिया’ असतो व त्याचे स्वरुप जास्त गंभीर असू शकते. मात्र या आजारावर तातडीने व योग्य प्रमाणात उपचार झाले तर, अनेक रुग्णांचा आजार पूर्वपदावर येऊ शकतो. यामध्ये २५ टक्के रुग्णांना एकदाच उपचार घ्यावे लागतात, २५ टक्के रुग्णांना त्या त्या ‘एपिसोड’मध्येच उपचार घ्यावे लागतात, २५ टक्के रुग्णांचा आजार दीर्घकालीन औषधोपचारांनी नियंत्रणात ठेवता येतो. मात्र २५ टक्के रुग्णांना औषधोपचारांचा फारसा उपयोग होत नाही व आक्रमक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावे लागतात. या आजारावर ईसीटी (शॉक ट्रिटमेंट) उपचार अतिशय प्रभावी असून, नवनवीन औषधेही अतिशय गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. सगळ्याच मनोविकारांची ट्रिटमेंट ही पेनलेस आहे व योग्य उपचारांनी रुग्ण त्यांची नोकरी-व्यवसाय करू शकतो आणि अशी असंख्य उदाहरणे समाजामध्ये आहे, असेही दोघांनी स्पष्ट केले. सई चपळगावकर, अमृता पंजाबी यांनी शांती नर्सिंग होमची माहिती दिली.
...
सध्याच्या ‘रॅटरेस’ने
मनोविकारांमध्ये वाढ
अलीकडे प्रचंड व सततची स्पर्धा, रॅटरेस, टोकाची विषमाता व स्पप्न पूर्ण न झाल्यास येणारे नैराश्य यामुळे एकूणच मनोविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आज दोन हजारांवर काम करणारे इंजिनीअर आहेत व २० लाख वेतन घेणारेही इंजिनीअर आहेत. ही टोकाची आर्थिक विषमता असल्यामुळेच आजचा विद्यार्थी एकलकोंडा होत असल्याचे निरीक्षण गोडबोले यांनी नोंदविले. या प्रसंगी गोडबोले व जोशी यांनी ‘मनात’, ‘मनकल्लोळ’, ‘लाइमलाइट’ या पुस्तकांमागची प्रेरणा, भावना व भूमिकाही अतिशय रंजकपणे स्पष्ट केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट