स्मार्टसिटीच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी २५ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. या दिवशी सोलार पॅनल बसवण्यासह संपूर्ण शहरात मोफत वायफाय सेवा देण्याचे काम देखील सुरू केले जाणार आहे. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला ‘एसपीव्ही’च्या नावे आतापर्यंत २८१ कोटी रुपये मिळाले आहेत.
केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश झाल्यानंतर पॅनसिटीअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून (एसपीव्ही) प्रयत्न केले जात आहेत. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी शासनाने महापालिकेला दोन टप्प्यांत २८१ कोटी दिले आहेत. त्यातून लवकरात लवकर काम सुरू व्हावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. ‘एसपीव्ही’चे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी मे महिन्यात एसपीव्हीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून स्मार्टसिटीची कामे सुरू करण्याचे आदेश दिले. चिकलठाणा शिवारात ग्रीनफिल्डचा विकास केला जाणार असल्यामुळे भूसंपादनाचे काम देखील सुरू करा, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पालिकेने एसपीव्हीच्या माध्यमातून काही उपक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारती, वॉर्ड कार्यालये, शाळा, हॉस्पिटल आदी ठिकाणी सोलार पॅनल बसवण्याच्या कामाचा शुभारंभ २५ जून रोजी केला जाणार आहे. पालिकेच्या मालकीच्या या इमारतींवर सोलार पॅनल बसवून सोलार सिटीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. सोलारचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वीज बिलामध्ये मोठी कपात होईल, अशी अपेक्षा आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर सोलार पॅनल बसविण्यासाठी त्यानंतर प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर फ्री वायफाय सिटीच्या प्रकल्पाचा देखील शुभारंभ केला जाणार आहे.
मोबाइल कंपन्यांची मदत घेणार
फ्री वायफाय सिटी प्रकल्पासाठी नागपूर मॉडेल वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नागपूर शहरात महापालिकेने फ्री वायफाय साठी स्वतः केबलिंग केले आहे. औरंगाबाद महापालिकेला ते शक्य नसल्यामुळे मोबाइल फोनच्या कंपन्यांच्या मदतीने काम करून घेतले जाणार आहे. २५ जूनपासून स्मार्टसिटीच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याच्या वृत्ताला पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दुजोरा दिला. सोलार पॅनल व फ्री वायफाय ही कामे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून ही कामे सुरू केली जातील, असे त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट