औरंगाबाद ः साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात गेल्या काही वर्षांमध्ये शाळा, कॉलेजसह सामाजिक संस्थांच्या मदतीने तब्बल अडीच लाख झाडे लावण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने वृक्षवल्ली जोपासणारे देशातील हे एकमेव साई क्रीडा केंद्र ठरले आहे. यंदाच्या पावसाळ्यात २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले.
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राला तब्बल १०८ एकर परिसर लाभलेला आहे. एकेकाळी हे केंद्र बंदच झाले होते. पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतर २००३मध्ये वीरेंद्र भांडारकर यांच्याकडे केंद्राचा चार्ज देण्यात आला. त्यावेळी केंद्रात अवघी पाच-सहा झाडे होती. केंद्राचा परिसर अतिशय भकास दिसत होतो. हा परिसरात इमारतीचे भग्नावशेष होते. भांडारकर यांनी केंद्रात आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करताना झाडे लावण्यावरही भर दिला. २०१०नंतर झाडे लावण्याचा उपक्रमावर अधिक भर देण्यात आला. शहरातील शाळा, कॉलेज, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्ही फॉर इनवायरमेंट, ग्लोबल फोरम, क्रिएटिव्ह ग्रुप यासारख्या सामाजिक संस्थांनी झाडे लावण्याकरिता पुढाकार घेतला. लष्करी विभाग, उद्योजक यांनीही झाडे लावण्याच्या उपक्रमाला हातभार लावला. त्यामुळे आजच्या स्थितीत साई केंद्रात तब्बल अडीच लाख झाडे डौलदारपणे उभी आहेत. परिसर हिरवाईने नटून गेलेला दिसून येतो. केंद्रात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुर्तफा लावलेली झाडे सर्व थकवा दूर करून टाकतो.
अडीच लाख झाडांमध्ये चिंच, आंबे, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, मोसंबी, जांभुळ, नारळ ही फळांची झाडे मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहेत. सावलीबरोबरच केंद्रातील खेळाडूंना फळे खाण्याचाही आनंद घेता येत आहे. लिंब, फायकस, पेट्रोमजिवा, अमलतास, बांबू, पिटोनिया, वड, पिंपळ, गुलमोहोर, टोपिया, सुरू, अशोका, चाफा ही झाडेही मोठ्या संख्येने दिसून येतात. निळ्या रंगाचे फुल येणारे निलमोहोराचीही काही झाडे लावण्यात आलेली आहेत. फळे, फुलांची झाडे वैशिष्ट्यपूर्ण रचनेने लावण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्राच्या सौंदर्यीकरणात भरच पडली आहे. झाडांची कटिंग व त्याला दिलेला आकार, बुंध्यांना केलेली रंगरंगोटी यामुळे परिसर अतिशय रेखीव दिसतो. झाडांमुळे परिसरातील वातावरण अगदी छान राहते. त्याचा नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना मोठा फायदा होत आहे. खेळाडूंबरोबरच नागरिकही मोठ्या संख्येने केंद्रात व्यायामासाठी येत आहेत. गेल्या काही वर्षांत ही संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे, असे भांडारकर यांनी सांगितले. साई केंद्रात एक जुनी विहीर आहे. तिचे पाणी पुरेसे ठरत नाही. नव्या विहिरीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्रातून वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी रोटरी क्लबच्या मदतीने पाझर तलाव उभारण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रातील पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. त्याचा फायदा झाडे जगवण्याकरिता निश्चितच होणार आहे, असे भांडारकर यांनी सांगितले.
कचऱ्यातून खत निर्मिती
झाडांची संख्या अडीच लाखांपर्यंत पोचल्यामुळे पानांची गळती होत असते. झाडाखाली होणाऱ्या कचऱ्यातून खत निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या दररोज दहा हजार किलो खत निर्मिती करण्यात येत आहे. या खताचा झाडांसाठी उपयोग करण्यात येतो. त्याचा फायदा दिसून येत आहे. या खताचा वापर केलेली झाडे लवकरच हिरवीगार झालेली दिसून येत आहेत. एवढ्या संख्येने झाडे केंद्राच्या परिसरात लावलेली आहे, त्यासाठी केंद्राकडून एकही पैसा खर्च केलेला नाही. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या मदतीनेच ही वृक्षवल्ली उभी राहिलेली आहे. यावर्षी २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे, असे भांडारकर यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट