म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रविवारी (११ जून) शहरात झालेल्या मेळाव्यात नाराजांची दखल घेण्याचा प्रयत्न पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोचून काम करण्याचा तसेच संघटना मजबूतीसाठी कानमंत्र दिला.
पक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या जिवावर चालतो, कार्यकर्ता हीच खऱ्या अर्थाने पक्षाची ताकद आहे. मात्र कार्यकर्ताही तोलामोलाचा असला पाहिजे, असे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात येत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भाषण करत असतांना कार्यकर्त्यांमध्ये बसलेले उदयसिंग राजपूत यांना तुम्ही मागे का बसलात, असे विचारताच एक कार्यकर्ता उभा राहिला आणि काम करणारे नेते मागेच बसतात आणि न काम करणारे लोक स्टेजवर बसले असल्याचे सांगितले. यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, पण परिस्थिती सावरून तटकरे यांनी भाषण पुढे सुरू ठेवले. यावेळी त्यांनी कदीरभाई कुठे आहेत, असे म्हणूनही विचारले. यावेळी त्यांनी संजय वाघचौरे आणि कदीर मौलाना राष्ट्रवादीतच राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
अजित पवार यांनीही त्यांच्या भाषणामध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी वाद विसरून पक्षबांधणीच्या कामाला लागा, असे सांगितले. यावेळी त्यांनी चंद्रकांत घोडके आणि संजय वाघचौरे यांचाही त्यांनी उल्लेख केला. मेळाव्यात अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी पक्षाचा लेखाजोखा मांडला व पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मेळाव्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार सतीश चव्हाण, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, माजी आमदार संजय वाघचौरे, मधुकरराव मुळे, कदीर मौलाना, मुश्ताक अहेमद, मनमोहनसिंग ओबेरॉय आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फिक्सिंग करणारे नको
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, काही लोक केवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात. आज इथे तर उद्या तिथे, यातील काही लोक विकले जातात. हे लोक केवळ निवडणुकीत फिक्सिंग करण्याचे काम करतात याचा फायदा विरोधकांना होतो. हे होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. कोणता कार्यकर्ता सर्वसामान्यांपर्यंत जातो हे पाहूनच येणाऱ्या काळात पदे देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. काही कार्यकर्ते केवळ पुष्पगुच्छ देऊन फोटोसेशन करण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मजबूत संख्याबळ; दुर्बल सरकार
राज्यात विद्यमान सरकारकडे मोठे संख्याबळ आहे. तरीही सरकारमध्ये सहभागी शिवसेना रोज सरकारचा विरोध करत आहे. सरकारकडे मोठे संख्याबळ असताना कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवत हिंमत असेल, तर सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान दिले.
औरंगाबादच्या आमदार, खासदारांनी काय केले ?
मराठवाड्याचे प्रवेदशद्वार असलेल्या औरंगाबाद शहरासाठी येथील आमदार आणि खासदारांनी काय केले. त्यांनी शहराच्या विकासाचे काय निर्णय घेतले, काय विकास केला. आज शहरात रस्ते, पाणी, ड्रेनेजची अवस्था बिकट असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या उलट आम्ही वीज तसेच इतर प्रश्नांबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
संघटना मजबूत हवीः मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसने १९ व्या वर्षात पदार्पण केले असून यापैकी पक्ष १५ वर्ष सत्तेत होता. गेल्या अडीच वर्षांपासून पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाची मुंबईतून प्रतिक्रिया आली, तर ती प्रत्येक तालुक्यात उमटायला हवी यासाठी पक्षसंघटना मजबूत हवी, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट