म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘फक्त आमच्याच बॅँकेचे कार्ड एटीएममध्ये चालेल,’ असे रिझर्व्ह बॅँकेच्या नियमांचे उल्लंघन करणारे आणि शहरवासीयांची दिशाभूल करणारे फलक भारतीय स्टेट बॅँक, पंजाब अॅँड महाराष्ट्र को. ऑप. बॅँकेसह इतर खासगी बॅंकांनी लावले होते. याबाबतची बातमी मंगळवारी (१३ जून) ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच हे फलक काढण्यात आले.
ऐन चलन टंचाईच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठराविक शाखांमध्ये व एटीएमवर ‘आमच्याच बॅँकेचे एटीएम कार्ड चालतील,’ असे फलक लावण्यात आले होते. गुरुद्वारा रोड शाखा व उस्मानपुरा शाखांमध्येही हे फलक लागले होते. यामुळे इतर बॅँकांचे ग्राहक या एटीएममध्ये पैसे असूनही बाहेरूनच काढता पाय घेत होते. शहरातील इतर एटीएम बंद असल्याने अडचण येत होती. याबाबतच्या अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या. तसे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच हे फलक मंगळवारी तातडीने हटविण्यात आले. दरम्यान, याविषयी बोलताना पंजाब अँड महाराष्ट्र को ऑप बँकेच्या उस्मानपुरा शाखेचे व्यवस्थापक अक्षता मुळे म्हणाले, ‘आम्ही लावलेले फलक काढून टाकले आहेत. याशिवाय आमच्या शाखेच्या एटीएममध्ये कोणत्याही बँकांचे कोणतेही एटीएम चालू शकतात. मात्र, सध्या आमच्याकडे रोकड उपलब्ध नाही. रोकड उपलब्ध झाली की एटीएममधून पैसे काढणे कोणालाही शक्य होणार आहे.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट