बीड बायपास रस्त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केलेली आहे. याचिकेच्या सुनावणीत महापालिका शहर अभियंत्यांनी बायपास रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रस्त्यावरील अडथळे व अतिक्रमण हटविण्यासाठीच्या उपाययोजना शपथपत्रद्वारे सादर कराव्यात, असे आदेश न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांनी दिले.
शहातील बीड बायपास रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी व इतर समस्यांच्या अनुशंगाने उपाययोजना करण्याची विनंती करणारी याचिका वकील शिवराज कडू-पाटील यांनी दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणी दरम्यान महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी बीड बायपास रस्त्यावरी दुतर्फा सर्व्हिस रोड व त्यातील अडथळे हटवण्यासाठी काय उपायोजना केल्या, याची माहिती द्यावी असे आदेश खंडपीठाने दिले. शासनातर्फे अर्चना गोंधळेकर, रस्तेविकास महामंडळातर्फे श्रीकांत अदवंत, महापालिकेतर्फे अमित वैद्य, रेल्वेतर्फे एम. एन. नावंदर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे डी. एस. मनोरकर यांनी काम पाहिले.
१४ जुलैला सुनावणी
गांधेली व बाळापूर शिवारातून जाणारा धुळे - सोलापूर बायपास रस्त्याचे काम धिम्या गतीने होत आहे. देवळाई चौकात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथे चौरस उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे. संबंधित विभागानेही शपथपत्र सादर करावे असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या याचिकेवर १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट