'शिवसेना व शेतकरी एकत्र आल्यामुळं सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला आहे. प्रश्न श्रेयाचा नाही. पण कर्जमाफीला फॅशन म्हणणाऱ्यांकडून आम्ही कर्जमाफी करवून घेतली', असं ठणकावून सांगत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारनं केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी नाशिक ते पुणतांबा हा दौरा केला व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज औरंगाबाद इथं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'कर्जमुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होते. कुठल्या गावातील कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला, यावर शिवसेना बारीक लक्ष ठेवून राहील, असं ते म्हणाले. 'शेतकऱ्यांची कुठंही फसवणूक होऊ नये ही आमची भूमिका आहे. म्हणूनच कर्जमाफीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अभासगट स्थापन करावा, अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या मागण्या
> कर्जमाफी जाहीर करताना ३० जून २०१६ पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकली होती, त्यांना लाभ मिळणार असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, ही मर्यादा जून २०१७ पर्यंत वाढवण्यात यावी.
> कर्जमुक्तीचा निर्णयाचा नेमका लाभ किती शेतकऱ्यांना झाला, याची यादी सरकारनं जाहीर करावी.
> नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत वाढ केली जावी.
> पुणतांब्यातील ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीनं मागे घ्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट