म. टा. प्रतिनिधी, बीड
पावसाच्या खंडामुळे उदभवलेल्या बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी केली. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामांचा आढावा त्यांनी बीड येथे घेतला. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
बीड जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी धावपळ करीत खरीपाच्या पेरण्या उरकल्या. बीड जिल्ह्याचे सरासरी खरीप क्षेत्र सहा लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. या तुलनेत
आतापर्यंत जिल्ह्यात कापूस ३ लाख २६ हजार पाच हेक्टर, सोयाबीन एक लाख ५० हजार ६५३ हेक्टर, बाजरी ५७ हजार ६९७ हेक्टर, तूर ३२ हजार १७१ हेक्टर, मूग १७,६२० हेक्टर, उडीद ३२,१८८ हेक्टर असे एकूण ६ लाख, ३५ हजार १५१ हेक्टर म्हणजेच ९६.४९ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. यावर्षी पेरणीची लगबग करून शेतकऱ्याने पेरणी उरकली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी उरकल्यानंतर पाऊस गायब झाल्याने पिके अडचणीत आली असून सुकू लागली आहेत. त्यामुळे या पीक परिस्थितीची पाहणी सोमवारी राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली.
गेवराई ,बीड, तालुक्यात थेट बांधावर जाऊन त्यांनी पीक परिस्थिती पाहिली. त्यासोबतच बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी तीन जिल्ह्यातील कृषी विभागाच्या योजनाचा आढावा घेतला. यावेळी केंद्रेकर यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अजून अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी. त्यामुळे पिक विमा भरण्यासाठी शेवटच्या आठवड्यात बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून काही दिवस सुट्टीच्या दिवशी पिक विमा स्वीकारण्याचे नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केली. जिल्ह्यात पावसाचा खंड पडला आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट किती क्षेत्रावर येईल याचा आढावा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घेतला. बीड जिल्ह्यात एकोणीस हजार हेक्टर वरील पीक पावसभावी अडचणीत आले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. मात्र, कृषी आयुक्तांनी कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन किती क्षेत्रावरील पिकाला पावसाने ओढ दिली व त्याचा पिकवाढीवर परिणाम होईल, उत्पनात किती घट होईल याची माहिती एकत्रित करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले.
त्यासोबतच अशी परिस्थिती उदभवल्यास आवश्यक खते, बियाणे याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना यांत्रिकारण योजनेतून औजारे आठ दिवसांत वाटप करावीत. ठिबक सिंचनाचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, शेतकरी आत्महत्या सुरू असलेल्या जिल्ह्यात अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे काम करावे, अशा सूचना यावेळी केंद्रेकर यांनी दिल्या.
कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा
शेती हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जोखीम असणारा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करू नका. त्यांच्या घरी जाऊन नवे तंत्राज्ञान द्यावे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती एकत्रीत करा. ऑफिसमध्ये बसून कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करावे. त्यांच्यापर्यंत योजना पोचवाव्यात. थेट उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधणार असून त्यांनी कामकाज सुधारावे, असेही केंद्रेकर म्हणाले.