स्वच्छ भारत मिशनतंर्गत २०१९ पर्यंत शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट असले तरी ही कामे उस्मानाबादेत वेळेपूर्वी पूर्ण व्हावीत यासाठी केंद्र व राज्य सरकार बरोबरच उस्मानाबाद जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. ही कामे वेळेत शिवाय गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावीत यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे विशेष दूत राज्यात जागोजागी कार्यरत आहेत. हे विशेष दूत जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन कामावर लक्ष ठेवत असून, या कामांचा दैनंदिन अहवाल ते पीएमओ कार्यालयाला पाठवत असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. राज्यात अशा प्रकारचे ६०० विशेष दूत कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत मिशन पूर्णतः यशस्वी व्हावे, यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचे काम जोमात सुरू असून, या कामाला जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी
वाहून घेतले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ मार्च २०१७ अखेर एकूण कुटुंब संख्या २ लाख ३८ हजार ३९६ इतकी होती. यापैकी १ लाख १९ हजार २३७ कुटुंबाकडे शौचालय होते. तर, शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या ही १ लाख १९ हजार १५९ इतकी होती. यापैकी ३२ हजार ८२७ ठिकाणी शौचालय बांधण्यात आली असून, उर्वरित ८६ हजार ३३२ शौचालयाच्या बांधकामासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
सध्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ९० दिवसाचे विशेष मिशन (१ जुलै ते ३० सप्टेंबर) सुरू असून, या विशेष मिशनमध्ये उस्मानाबाद जिल्हा हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र पर्यटन करताहेत. ग्राम पातळीवर
तेथील पदाधिकारी व नेतेमंडळी यांचीही चांगली साथ लाभत आहे.
या मोहिमेत आता शालेय विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. उघड्यावर शौचास न जाणे हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे आता ग्रामस्थांना समजावून सांगण्याकामी आता विद्यार्थी व आरोग्य विभागातील मंडळी सक्रिय झाले आहेत.
याशिवाय शौचालय नसणाऱ्याच्या सर्व शासकीय सोयी-सुविधा खंडित करून, त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना चाप बसावा यासाठी गुडमॉर्निंग पथक सक्रिय आहेत. उघड्यावर बसणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. जेणेकरून ग्रामस्थांनी उघड्यावर शौचास न जाता शौचालयाचा वापर करून ग्राम स्वच्छ ठेवावे हा उद्देश आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद सध्या राबवीत असलेल्या ९० दिवस विशेष मिशनमध्ये ३० सप्टेंबर अखेर संपूर्ण जिल्हा हा हागणदारीमुक्त होईल असा विश्वास आनंद रायते यांनी यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार उपस्थित होते.
आरोग्य केंद्रावर शौचालयाची सक्ती
आरोग्य केंद्रावरही शौचालय बांधण्याची सक्ती केली जात आहे. आरोग्य केंद्रावर शौचालय असणाऱ्यासाठी स्वतंत्र लाइन असून त्यांच्यावर प्राधान्याने औषधोपचार केले जातात. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र लाइन असून, त्यांना मोफत औषधे दिली जात नाहीत. त्यांना औषधे विकत घ्यावी लागताहेत. जेणेकरून ग्रामस्थांनी शौचालय बांधून गाव स्वच्छ ठेवावे हा यामागील उद्देश आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या या कामाचा लेखाजोखा दररोज पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शौचालय उभारण्यास जागा उपलब्ध नाही. अशा ठिकाणी त्या घरालगत असलेल्या खुल्या जागेत त्याला शौचालयाचा खड्डा घेण्यास शासनाने संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात ही कामे रखडणार नाहीत. शिवाय या कामी निधींचीही कमतरता नाही. त्यामुळे स्वच्छ भारतचे आव्हान उस्मानाबाद जिल्ह्यात वेळेत पूर्ण होईल.
आनंद रायते, सीईओ, उस्मानाबाद.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट