म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुचर्चित अन् वादग्रस्त चीन दौऱ्याहून परतलेल्या महापालिका पदाधिकाऱ्यांना सध्या ड्रॅनगची महाकाय प्रगती, विकासाने पुरते झपाटले असून त्यांनी चक्क ‘शहरातील एक तरी रस्ता स्मार्ट करू. चीनप्रमाणे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारू,’ असा निर्धार मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
चीनमधील चेंगडू व ड्युनहँग शहरांमध्ये ब्रिक्स देशांची विकास परिषद झाली. त्यात महापौर भगवान घडमोडे, आयुक्त डी. एम. मुगळीकर, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक कचरू घोडके, शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ सहभागी झाले. या दौऱ्याहून परतल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपले अनुभव सांगितले. महापौर म्हणाले, ‘चीनने चेंगडू येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात रोज २४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली करण्यात येते. संपूर्ण कचरा जाळण्यात येतो. त्यापासून होणाऱ्या राखेच्या विटा तयार केल्या जातात. असा प्रकल्प औरंगाबादेत उभारणे शक्य आहे.’
आयुक्त म्हणाले, ‘औरंगाबादेत रोज जास्तीत जास्त ४०० टन कचरा गोळा होतो. स्मार्ट सिटीअंतर्गत पॅन सिटीमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प घेण्यात आला आहे. त्यातून चीनच्या पद्धतीने कचऱ्यावरचा प्रक्रिया प्रकल्प करता येईल.चीनमधील रस्ते अत्यंत रुंद, स्वच्छ होते. दुभाजकांची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण होती’. शिष्टमंडळाने चीन येथील सफारी पार्कला भेट दिली. याबद्दल महापौर म्हणाले, ‘बांबूच्या बनाने वेढलेले सफारी पार्क अत्यंत विलोभनीय होते. पांडा हा चीनचा महत्त्वाचा प्राणी. औरंगाबादेतही येत्या काळात सफारी पार्क विकसित केले जाणार आहे. या पार्कसाठी पांडा प्राणी देण्याची विनंती राजेंद्र जंजाळ यांनी केली. त्याला तेथील व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.’
‘फ्लाइंग अप्सरे’ची संकल्पना
चीनमध्ये ‘फ्लाइंग अप्सरा’ ही विकासाची संकल्पना आहे. पथदिव्यांचा आकार ‘फ्लाइंग अप्सरा’सारखा आहे. चीनच्या पद्धतीनेच शहरातील एखादा रस्ता शासनाकडून मिळणाऱ्या शंभर कोटींतून स्मार्ट करू,’ असा निर्धार महापौर व आयुक्तांनी केला. ‘वेरूळ-अजिंठा महोत्सवात सहभागी होण्याची चीनमधील कलावंतांची इच्छा आहे. त्यांना या निमंत्रण पाठवू,’ असे आयुक्त म्हणाले.
कचरू घोडके हरवले
चीन दौऱ्यातच्या शिष्टमंडळात नगरसेवक कचरू घोडके यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी या सर्वांचे विमान बिजिंगला उतरले. विमानतळाच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत जाण्यासाठी रेल्वे व्यवस्था होती. घोडके दुसऱ्याच रेल्वेत बसले. घोडके हरवल्यामुळे त्यांच्या बरोबरच्या सदस्यांनी शोधाशोध सुरू केली, पण फोन लागत नव्हता. अखेर एक तासाने घोडके परतले.
ज्यूस, ब्रेड अन् अंडी खाऊन काढले दिवस
चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या महापालिकेच्या शिष्टमंडळाचे खाण्याचे मात्र अतोनात हाल झाले. त्यांना आठ दिवस फळांचा रस, ब्रेड आणि अंडी खाऊनच काढावे लागले.
अर्धवट शिजवलेले मटन आणि अर्धवट शिजवलेली पालेभाजी हे चीनमधील नागरिकांचे अन्न आहे. अन्न शिजवण्यासाठी पामतेलाचा वापर केला जातो. त्या तेलालाही विशिष्ट प्रकारचा वास असल्यामुळे शाकाहारी जेवण करणाऱ्यांना त्या तेलाची घृणाच येते. त्यामुळे मटन व भाज्यांच्या नादी न लागता शिष्टमंडळातील सदस्यांनी फळे, ब्रेडवरच ताव मारला. शिष्टमंडळात सहभागी झालेले शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ अनौपचारिक चर्चा करताना म्हणाले, ‘चीनमधील नागरिकांचे खाद्य म्हणजे मासे, मटन आणि पालेभाज्या. हे सर्व अर्धवट शिजवलेले असते. मटनाचे नानाविध प्रकार आहेत. पामतेलात ते शिजवले जाते. पामतेल तयार करण्याची पद्धत देखील वेगळी. त्याच्या वासामुळे आपण तेथील अन्न खाऊच शकत नाही.
‘चीनमधील नागरिक जेवण झाल्यावर पाण्याऐवजी ‘ग्रीन टी’ पितात. या सर्व प्रकारामुळे आमची खाण्याची पंचाईत होणार हे लक्षात आले. त्यामुळे आम्ही फळे, ज्यूस, ब्रेड आणि अंडी असाच आहार ठेवला. प्रामुख्याने टरबूज, खरबूज खाण्याला पसंती दिली. तेथे दूध मिळायचे, पण आपल्यासारखा चहा मिळत नव्हता. चेंगूड शहरात भारतीय जेवण देणारे दोन हॉटेल्स आम्ही शोधून काढले. तेथे जेवण केले,’ असा अनुभव जंजाळ यांनी सांगितला.
रांग तोडणारा झाला खजिल
‘चीनमध्ये महागाई खूप आहे. मात्र, शिस्त वाखाणण्याजोगी आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय शिष्टमंडळाला थांबवले होते त्या हॉटेलमध्ये चहा, नाष्टा, जेवणासाठी रांग लावावी लागायची. एका व्यक्तीने रांग तोडून थेट काउंटर गाठले. तेव्हा काउंटरवरच्या वाढप्याने रांग तोडणाऱ्या व्यक्तीचीच माफी मागितली. त्यामुळे रांग तोडणारा खजिल होवून परतला,’ असा किस्साही राजेंद्र जंजाळ यांनी सांगितला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट