‘जगात आमचा देश ज्ञानी असून विमान आणि सर्जरी शेकडो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती असा डंका पिटणारे लोक चातुर्वण्याची भलावण करतात. दलितांवरचे अन्याय ते कधीच सांगत नाहीत. देशात दरवर्षी दलित अत्याचाराच्या ४० हजार घटना घडतात. दलित समाज सत्ताधारी झाला पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. या स्वप्नासाठी एकजुटीने जातीयवादी शक्तींचा बिमोड करा’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले. संघर्ष परिषदेत ते बोलत होते.
फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेने संघर्ष परिषद घेतली. संत तुकाराम नाट्यगृहात गुरुवारी दुपारी ही परिषद झाली. यावेळी मंचावर ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, डॉ. प्रतिभा अहिरे, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, डॉ. भालचंद्र कांगो, रमेशभाई खंडागळे, मिलिंद पाटील, साथी सुभाष लोमटे, अजमल खान, भीमराव सोनवणे, राम बाहेती, अण्णा खंदारे, लक्ष्मण जाधव व वर्षा गुप्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील तीन वर्षात दलित व अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत. खासगीकरणाने रोजगार हिरावला जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष परिषद घेण्यात आली.
‘पुरोगामी, डाव्या, आंबेडकरी चळवळीसमोरील आव्हाने’ या विषयावर भाई वैद्य यांनी सविस्तर भाषण केले. निवडणूक जिंकून जर्मनीचा सर्वेसर्वा होण्यापूर्वी हिटलरने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. जर्मनीला जगात सर्वश्रेष्ठ करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला भुलून लोकांनी निवडून दिले. भारतातसुद्धा हिटलरशाही येऊ घातली आहे. देशाचे पंतप्रधान म्हणजे हंटर घेऊन सर्वांना शिस्तीत काम करायला लावणारा नेता, असे लोकांना वाटते. मात्र, ते तसे नाही. साठ लाख अल्पसंख्याक ज्यूंची हिटलरने हत्या केली होती हे लक्षात घ्या. हिटलरचे समर्थन करणारी माणसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती. या देशात मानवाची उपेक्षा होते. किड्या-मुंग्यासारखी माणसे मरतात. पण, चीड-खेद उपाययोजना काहीच नाही. अशा देशाचा विकास निर्देशांकात १७८ देशात १३४ वा क्रमांक आहे. सेनगुप्ता अहवालानुसार ८२ टक्के लोक प्रचंड गरीब आहेत. दलित समाज सत्ताधारी करण्याचे आंबेडकरांचे स्वप्न होते. मोदींच्या कुशीत शिरून सत्ताधारी झालेले नाही. एकजुटीने जातीय शक्तीचा बिमोड करा’ असे वैद्य म्हणाले.
दरम्यान, या परिषदेत प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा सन्मानपत्र व संविधानाची प्रत भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दक्ष रहा
‘एखाद्या व्यक्तीला जिवंतपणी प्रचंड त्रास देऊन निंदा-नालस्ती करून नामोहरम करण्यात येते. ती व्यक्ती मरण पावल्यानंतरही समाज मानत असेल तर आपणही पूजा करायची असा संघाचा डाव असतो. सध्या आंबेडकर, गांधी, विवेकानंद यांचा जयघोष करण्यात ते पुढे आहेत. बाईला धक्का लागला तर बाई किमान शिव्या देईल. पण, गायीला धक्का लागल्यास आपण जिवंत राहू की नाही अशी स्थिती आहे’ असे वैद्य म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट