अपंग ‘यूडीआयडी’च्या प्रतिक्षेत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारच्या ‘युनिक डिसॅबिलिटी आयडी’द्वारे सर्व प्रकारचे अपंगत्व असणाऱ्यांना सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असून, देशभर-राज्यभर या आयडी कार्डांचे वाटप सुरू झाले आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात या कार्डांचे वाटप सुरुच झालेले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय अद्याप सुरुच नसल्याचे निमित्त करुन आरोग्य विभागाने हात वर केले आहेत, तर युजर-आयडी व पासवर्ड घाटीच्या नावाने आला नसल्याचे कारण देत घाटीने कार्डांचे वाटप सुरू केलेले नाही. परिणामी, जिल्ह्यातील लाखभर अपंग ‘यूडीआयडी’पासून वंचित आहेत.
वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी, तसेच रेल्वे पास व इतर अनेक बाबींसाठी अपंगांना शब्दशः प्रमाणपत्रांचा गठ्ठा घेऊन फिरावे लागत होते. त्याचवेळी वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे नियम होते व एका राज्यातील नियम दुसऱ्या राज्यात लागू होतीलच, असे नव्हते. त्यामुळेच एकसमानता येण्यासाठी व केवळ एका कार्डाद्वारे संपूर्ण देशभरातील सर्व प्रकारच्या योजना लागू होण्यासाठी ‘युनिक डिसॅबिलिटी आयडी’ची (यूडीआयडी) अंमलबजावणी देशभर सुरू झाली आहे. राज्यातील जवळजवळ निम्म्या जिल्ह्यांमध्ये कार्ड वाटप सुरू झाले असले तरी, औरंगाबाद जिल्ह्यात कार्ड वाटप सुरू झालेले नाही. शासकीय आदेशानुसार ज्या ठिकाणी अपंगांसाठी ऑनलाईन प्रमाणपत्रांचे वाटप होते, त्या प्रत्येक ठिकाणी ‘युडीआयडी’चे वाटप होणे आवश्यक आहे. त्याचवेळी थेट तालुकास्तरापासून अपंग प्रमाणपत्र देण्याचे आदेश असले तरी, आजपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्ह्यातील कोणत्याच रुग्णालयामार्फत किंवा कार्यालयामार्फत या प्रमाणपत्रांचे वाटप होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत (घाटी) प्रमाणपत्रांचे वाटप होत असल्यामुळे अपंगांना मागच्या तीन ते चार वर्षांपासून अनेक महिन्यांच्या वेटिंगचा सामना करावा लागतो आहे. आता पुन्हा जिल्हा रुग्णालय कार्यरत नसल्याने घाटीमार्फतच ‘युडीआयडी’चे वाटप होण्याचे संकेत आहेत आणि त्यामुळेच वेटिंग जैसे थे राहणार आहे, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट