आयटीआय प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना तीन ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, तर दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ट्रेड व संस्थेचे पर्याय देण्याची मुदत एक ते तीन ऑगस्टपर्यंत आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया १९ जूनपासून सुरू झाली. अंतिम गुणवत्ता यादी १५ जुलै रोजी जाहीर झाली. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी २८ जुलै रोजी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी वेबसाइटवर जाहीर झाली. विद्यार्थ्यांना २८ ते ३१ जुलैदरम्यान प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत होती. सोमवारी मुदत संपत असताना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या वेळापत्रकानुसार तीन ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अॅलॉटमेंट लेटर व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी निवड झालेल्या संस्थेत प्रवेशाची प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने २० ते ३० टक्के जागांवरच प्रवेश पूर्ण झाले आहेत.
पुढचे वेळापत्रक
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरू होत आहे. तीन ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीसाठी प्राधान्यक्रम भरता येणार आहे. सहा ऑगस्ट रोजी जागा वाटपाची यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये जाऊन सात ते दहा ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. तिसरी फेरीसाठी सात ते दहा ऑगस्ट दरम्यान प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया. १३ ला जागा वाटपाची यादी जाहीर होईल. १४ ते १७ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया होईल. चौथी फेरीसाठी प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया १४ ते १७ ऑगस्ट पर्यंत चालेल. २० ऑगस्टला जागा वाटपाची यादी जाहीर होईल. २१ ते २४ ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर शासकीय संस्थांमधील रिक्त जागांसाठी समुपदेशन फेरीची प्रक्रिया होणार आहे.
३० टक्के प्रवेश
प्रवेशाचे वेळापत्रक लांबल्याने प्रवेश प्रक्रियेत सोमवारपर्यंत ३० टक्केच प्रवेश झाले. औरंगाबादमध्ये मुलांच्या आयटीआयमध्ये १ हजार १२६ प्रवेश क्षमता आहे. सोमवार सायंकाळपर्यंत ३८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मुदतवाढ मिळाल्याने फायदा होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट