टीम मटा, औरंगाबाद
खरीप हंगामासाठीच्या पिक विम्यामध्ये सहभागी होण्यासाठीची मुदत केंद्र सरकारने पाच ऑगस्टपर्यंत वाढविली असली, तरीही सुधारित आदेशच बँकांना मिळाला नाही. त्यामुळे, मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मंगळवारीही गोंधळाची परिस्थिती होती.
मराठवाड्यामध्ये पिक विम्यासाठी बहुतांश शेतकरी उत्सुक आहेत. मात्र, यंदा प्रक्रिया ऑनलाइन केल्यानंतर, आवश्यक माहिती भरण्यामध्ये सुरुवातीपासूनच गोंधळ होता. यातच, इंटरनेट, सर्व्हर असे वेगवेगळ्या समस्या शेतकऱ्यांसमोर होत्या. त्यामुळे, जुलैच्या अखेरच्या आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होत होती. यातून गोंधळ वाढत असताना, मुदतही वाढवण्यात येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अखेरच्या क्षणी ही मुदत वाढविण्यात आली. त्यानंतरही गोंधळ कायम असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.
उस्मानाबादमध्ये चिंता
राज्य सरकारने पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढीची घोषणा केली असली, तरी उस्मानाबाद जिल्ह्यात तसे लेखी आदेश न पाहोचल्याने शेतकऱ्याकडून पीक विमा भरून घेतला जात नाही. अद्याप जिल्ह्यात जवळपास ६० हजार शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत, असे असतानाही बँक व प्रशासन प्रतिसाद देताना दिसत नाही.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत अद्याप लेखी किंवा तोंडी आदेश मिळाला नसल्याने अनेक शेतकरी पीक विमा भरण्यासाठी वाट पाहत थांबले आहेत. एकीकडे दुष्काळ स्थिती असताना शेतकरी पीक विमा भरण्यासाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, बँक प्रतिसाद देत नाहीत. दुपारी १२ वाजेपर्यंत बँकांना शासन आदेश प्राप्त न झाल्याने त्यांनी पीक विमा घेण्याचे टाळले. शासनाच्या या भूमिकेबद्दल व बँकाकडून होणाऱ्या अक्षम्य कारवाई बद्दल शेतकऱ्यांत तीव्र असंतोष व्यक्त होत असून, सरकारची घोषणा पोकळ असल्याची टीका होत आहे. दरम्यान ,एरव्ही जिल्हा बँकेचे मालक म्हणून मिरवणारे संचालक मंडळ व राजकीय नेते मंडळी मात्र शेतकरी अडचणीत असताना बँकेकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेवर सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे
नांदेडमध्येही रांगा कायम राहणार
नांदेड : अगदी शेवटच्या टप्प्यात सरकारने पिक विमा भरण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु सुविधा केंद्रांवर ऑनलाइन फॉर्म भरताना आजही तोच अडथळा कायम असल्याने रांगामधील सर्वच शेतकरी पिक विमा घेऊ शकले नाहीत.
पिक विमा भरण्याची सोमवारी (३१ जुलै) विमा भरण्याची शेवटची तारीख होती. जिल्हा बँकेसह हैदराबाद आणि महाराष्ट्र बँकेच्या शाखा तसेच ई-महासेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. नांदेडमधील सर्वच नेत्यांनी आणि खुद्द कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आणखी दहा दिवस पिक विमा स्वीकारण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात केवळ पाच दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. ती अपुरी आहे. त्यामुळे आजही वेळ संपताच अनेक बँकांनी शटर डाऊन केल्याने रंगामधील हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत.
लातूर जिल्ह्यात ३५ कोटींचा विमा
लातूर : लातूर जिल्ह्यात पिक विमा हप्ता भरण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर बँकांनी सहकार्याची भूमिका घेतली होती. जिल्हा बँकेच्या ११६ शाखांतून गोंधळ न होता शेतकऱ्यांनी शिस्तीत यंदा जास्तीचा पिक विमा हप्ता भरला. हा विमा ३५ कोटी आठ लाख ५८ हजार रुपये झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांनी दिली.
सरकारने पिक विमा भरण्याची मुदत वाढवली आहे. मात्र, जिल्ह्यामध्ये त्याची फारशी गरज उरली नव्हती. पिक विमा भरुन घेण्यासाठी जिल्हा बँकेने विशेष व्यवस्था केलेली होती. त्यामुळे इतरत्र झालेल्या त्रासासारखा त्रास लातूर जिल्ह्यात झालेला नाही. जिल्हा बँकेतच ३५ लाख आठ हजार २४० शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तीचा आहे. गेल्या वर्षी ३३ लाख चार हजार तीन शेतकऱ्यांनी २९ कोटी ८४ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला असल्याची माहिती कार्यकारी संचालकांनी दिली. अातापर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला असण्याची शक्यता असल्याची माहिती कार्यकारी संचालक जाधव यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट