Tweet : @tusharbMT
औरंगाबाद ः कोरडवाहू शेती फायदेशीर नसल्याच्या भयावह परिस्थितीत सुनंदा मदनराव शिंदे यांनी अभिनव प्रयोगाद्वारे प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. रब्बी ज्वारीची तांत्रिक लागवड, बीटी बियाण्यांचा मानोली पॅटर्न आणि शेतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने नुकताच ‘जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार’ देऊन सुनंदाताई यांचा सन्मान केला. नावीन्यपूर्ण प्रयोगातून शेती फायदेशीर ठरते असा आदर्श सुनंदाताई यांनी निर्माण केला.
मानोली (ता. मानवत) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुनंदा मदनराव शिंदे यांची ख्याती शेतीत नवीन प्रयोग करणारी शेतकरी अशी आहे. शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते पती मदनराव शिंदे यांच्या जोडीने गेल्या २५ वर्षांत सुनंदाताई यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. पाच वर्षांपासून प्रतिकूल हवामानाने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पावसाने दडी मारल्यास कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान होते. सुनंदा शिंदे यांनी कापूस लागवडीत अभिनव प्रयोग केला. कापसाचे बियाणे रात्रभर भिजवून कोवळे-किडके बियाणे फेकून कसदार बियाणे निवडले. अनियमित पाऊस लक्षात घेऊन रेषेवर बियाणे लागवड न करता रेषेच्या बाजुला लागवड केली. त्याच्यावर कोरडी माती टाकल्याने जमिनीतील ओल टिकून पाऊस नसला तरी नुकसान थांबले. कारण ऊन व अतितीव्र वाऱ्यामुळे होणारे बाष्पीभवन टाळले गेले. या प्रयोगाची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दखल घेतली. कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी शेतात प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग इतरत्र राबवला. शिंदे यांनी ज्वारीचे सुधारित वाण वापरून एकरी १५ ते २० क्विंटल उत्पादन काढले. १९७८ मध्ये सर्वप्रथम संकरित कापसाची लागवड केली. दुष्काळात चारा टंचाई असताना ‘हायड्रोपोनिक’ चारा निर्मिती करून दुग्धव्यवसाय टिकवला. सध्या शेतात मूग, सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, संत्रा पिके आहेत. वैविध्यपूर्ण प्रयोगांचे यश लक्षात घेऊन सुनंदा शिंदे यांना अखिल भारतीय कृषी संशोधन परिषदेचा ‘किसान पुरस्कार’ नवी दिल्ली येथे नुकताच केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी प्रदान केला.
पूरक व्यवसायाची जोड
फक्त शेतीवर गुजराण कठीण असताना सुनंदाताई यांनी बंदिस्त शेळीपालन सुरू केले आहे. शेतात नियमित काम करताना त्यांनी स्वतःचे प्रयोग निश्चित केले आहेत. समान उगवण शक्ती असणारे पीक आणि भरघोस उत्पादन हे शिंदे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
कष्ट आणि नियोजनाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे शेतीत चांगले उत्पादन मिळाले. अनियमित पावसाचा विचार करून शेतकऱ्यांनी लागवडीत काही बदल करावे. या पुरस्काराचा खूप आनंद वाटला.
- सुनंदा शिंदे, शेतकरी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट