यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद झाली असून, पिण्याच्या पाण्याची टँकरसंख्या १२४वर गेली आहे.
२७ गावातील नागरिकांचा घसा ऐन पावसाळ्यात कोरडा आहे. सध्या पैठण तालुक्यातील २७ गावांना ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून येत्या काही दिवसांमध्ये २० पेक्षा अधिक टँकरला मंजुरी मिळणार आहे. सध्या औरंगाबाद तालुक्यातील २८ गावात २४, फुलंब्रीच्या चार गावात ६, गंगापूर तालुक्यातील ४६ गावात सर्वाधिक ४६, सिल्लोड ९ गावात ११, वैजापूर १० गावात ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३१ हजार ६२३, गंगापूर तालुक्यातील १ लाख ३९ हजार, वैजापूर १० हजार ८४४, कन्नड, तर सिल्लोड तालुक्यातील २५ हजार ११९ असे एकूण दोन लाख ५३ हजार नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पावसाने सरासरीही ओलांडली नाही. फुलंब्री व वैजापूर तालुक्यात तुलनेत चांगला पाऊस असल्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा या तालुक्यांमध्ये टँकरसंख्या कमी आहे.
पाण्यावर ४८ कोटी
यंदा ऐन पावसाळ्यात आजवर केवळ २६ दिवस पाऊस झाल्यामुळे प्रशासनाला पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांनी टंचाई कालावधी तसेच जून महिना अखेरपर्यंतचा खर्च विभागीय प्रशासनाकडे सादर केला असून, या काळात तब्बल ४८ कोटी ९२ लाख खर्च करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात पाण्यासाठी इतर उपाययोजनाही केल्यामुळे मराठवाड्याच्या एकूण खर्चाच्या तुलनेत यातील निम्मा २३ कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च केवळ औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आला. हा खर्च टंचाईच्या कालावधीसह केवळ जून अखेरचा खर्च आहे. पावसाने दडी मारल्यास सप्टेंबर अखेर खर्चाचा आकडा मोठा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात जूनअखेर सर्वाधिक २५ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च टँकरवर करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट