पावसाने ओढ दिल्याने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी संयुक्त पथकाची स्थापना केली आहे. हे पथक येत्या आठ दिवसांत अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे. या पथकात कृषी, महसूल, बँक व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस न पडल्याने खरीप पिके करपू लागली असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने पिकाचे पंचनामे करून अर्थसहाय्य करण्याची मागणी जोर धरू लागल्याने शिवाय जिल्ह्यातील पिकांची गंभीर स्तिथी पाहता याची जिल्हाधिकरी यांनी तातडीने दखल घेत संयुक्त पाहणी पथकाची स्थापना केली.
पाच वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांमागील संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. खरीप हंगामात मोठ्या मेहनतीने केलेली पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दीड महिन्यांपासून वरुणराजाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या आहेत.
महागडी खते, बी-बियाणे, कीटकनाशकांसह मशागतीवर हजारो रुपये खर्चूनही सोयाबीन, मूग, उडीद, तूर या नगदी पिकांना तडाखा बसला आहे. नुकसानीचे पंचनामे आणि मदतीवरच आता रब्बीची मदार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या रब्बी आणि खरीप हंगामातील नुकसानीपोटी मिळालेल्या रकमेचा आधार मिळेल असे वाटत होते. चलन तुटवड्याअभावी ही रक्कम वेळेवर हाती आली नाही. तसेच बँकेकडूनही कर्ज न मिळाल्याने अखेर उसनवारी, प्रसंगी सावकाराचे उंबरठे झिजवून पेरणीसाठी रक्कम जमा करुन मातीतला जुगार खेळण्यासाठी शेतकरी सज्ज झाला. रोहिण्यापाठोपाठ मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील ५ लाख १ हजार ८०९ हेक्टरवर पेरणी केली. जून महिन्यात झालेल्या जेमतेम पावसांवर पिकांची वाढ चांगली झाली. मात्र, दीड महिन्यांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. परिणामी लाखो हेक्टर वरील पिकांनी माना टाकल्या आहेत. तर अनेक शिवारात पिकांची वाढ झाली असली तरी अळ्यासह रोगाचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण झाल्यामुळे आता दुबार पेरणीही करणे शक्य नाही. त्यामुळे अवर्षण स्थितीचा जबर फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. उस्मानाबादसह तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम, कळंब, वाशी तालु्नयातही अशीच भयंकर स्थिती बनल्याने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७२ हजार ६०० हेक्टर एवढे आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी ५ लाख १ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. जिल्ह्याचे सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात २ लाख २४ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र ९७ हजार हेक्टर असून प्रत्यक्षात पेरणी ८६ हजार ३०५ हेक्टर, उडिदाच्या ४१ हजार ५०० पैकी ६० हजार २३७, मूग १५ हजार ८०० पैकी प्रत्यक्षात ३१ हजार ७५, मका १८ हजार ५०० पैकी २१ हजार ८७७, कापूस सरासरी २४ हजार ६०० पैकी २२ हजार ६९२ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
संयुक्त पथकाची स्थापना
पावसाने ओढ दिल्याने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी संयुक्त पथकाची स्थापना केली असून या पथकात जिल्हा कृषी अधीक्षक, महसूल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, बँकांचे व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असून हे पथक प्रत्यक्ष उद्यापासून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी घेऊन पिकांची पाहणी करणार आहेत. याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीची तक्रार नोंदवायची असेल त्यांनी बँकेमार्फत अर्ज करून नोंदवावी किंवा तक्रार अर्ज कृषी अधीक्षक कार्यालयात, जिल्हा परिषद कृषी, विस्तार अधिकारी कार्यालयात, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटीमध्ये टाकावा असे आवाहन राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट