बनावट रहिवासी प्रमाणपत्र व राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या ३७ उमेदवारांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी शुक्रवारी दिले. या सर्वांचा नियमित जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
या प्रकरणी छावणीचे कर्नल मोहनपाल सिंग यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २०१५ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात औरंगाबाद येथे भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा झाला होता. यातील लेखी परीक्षेमध्ये १ हजार ५० उमेदवार उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीत ४३ उमेदवारांच्या रहिवासी प्रमाणपत्रांवर संबंधीत तहसीलदारांची बनावट सही व शिक्के असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी ४३ जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन झालेल्या ३७ उमेदवारांना छावणी पोलिसांनी बुधवारी (९ ऑगस्ट) अटक केली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. सर्व ३७ आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर सर्व आरोपींनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, सर्वांचा नियमित जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट