मटा, औरंगाबाद
सर्वत्र भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सत्तरावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सर्वत्र जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
७४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी
उस्मानाबाद - शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकाने यावर्षी सर्वात मोठी कर्जमाफी योजना अंमलात आणली आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७४ हजार ४२० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. तसेच प्रोत्साहनपर योजनेंतर्गत ८६ हजार ४३३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या ध्वजारोहण सोहळयास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदचे मख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
‘विकासात प्रत्येकाचे योगदान’
परभणी - परभणी जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. लोकप्रतिनिधी प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याच्या विकास अधिक वेगाने शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करून झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील संदेशपर भाषणात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, पोलिस अधिक्षक दिलीप झळके, तसेच खासदार संजय जाधव, आमदार मोहन फड, आमदार राहुल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला राठोड, उपाध्यक्षा भावना नखाते आदि मान्यवर उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर महसूल, क्रीडा, शिक्षण, पोलिस आणि कारागृह विभागांतर्गत विविध पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या डिजीटल चित्ररथालाही पालकमंत्री पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
......................
‘हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा’
जालना - संपुर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छता विभागामार्फत यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात येत असून राज्यात आजपर्यंत ११ जिल्हे, १५७ तालुके आणि १७ हजार ७०० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. जालना जिल्ह्यातील चार तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. येणाऱ्या काळात संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, रामेश्वर भांदरगे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजु नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती होती.
....................
‘उदय योजना वंचितांसाठी वरदान’
नांदेड : भटक्या जमातीतील वंचितांचे स्थलांतर रोखणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची वंचितांसाठी ‘उदय’ योजना वरदान ठरेल, असा विश्वास राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम पार पडला.
या समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातुरमध्ये गुणवंतांचा सत्कार
म. टा. प्रतिनिधी, लातूर
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सत्तराव्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थी तसेच पोलिस विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड, माजी खासदार रुपा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपमहापौर देविदास काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य), सुनील यादव, यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट