म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
श्रीगणेशचतुर्थी, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे गुरुवारी (२३ ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चार आंदोलनांनी दुमदुमून गेला. अखिल भारतीय कैकाडी महासंघ, महाराष्ट्र सेना, अॅड. रमा कांबळे, मूल निवासी संघ या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी, विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलक सहभागी झाले होते.
कैकाडी जातीवरील क्षेत्रीय बंधन उठवावे, वसंतराव नाईक महामंडळाकडून समाजातील युवकांना कर्ज मंजूर करण्यात यावे. कैकाडी समाज कसत असलेल्या गायरान जमिनी त्यांच्या नावे करून देण्यात याव्यात, मुद्रा लोन विनाअट समाजातील युवकांना मंजूर करुन देण्यात यावा, कैकाडी समाजावरील वाढते अत्याचार व हल्ले थांबवण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सचिव शरद माने, रोहिदास जाधव, संस्थापक अध्यक्ष संजय मेडे, जिल्हाध्यक्ष संपत जाधव, रमेश गायकवाड, किसन जाधव यांच्यासह कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अतिक्रमणधारक बेघर नागरिकांना म्हाडा, सिडको व हडकोमार्फत अतिक्रमित जागेवर बेघरांच्या कुवतीप्रमाणे अल्पदारात घरे द्यावी, हा निर्णय होईपर्यंत अतिक्रमण धारकांना हुसकावून लावू नये आदी मागण्यांसाठी मूलनिवासी संघातर्फ जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आंदोलन केले. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व रोजगार मिळण्याचा हक्क कायदा करावा. मौजे हर्सूल येथील गट नंबर २१६ व २१७ आणि चिकलठाण्यातील गट नंबर ४७२ येथील अतिक्रमणधारकांना हुसकावून लावू नये. हर्सूल येथील अतिक्रमणधारकांना मुलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर अॅड. विजय वानखेडे, संदीप जाधव, संतोष बोरडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सरकारी नोकरीची खासगीकरण करू नये, मागासवर्गीयांना नोकऱ्या द्याव्या, शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्तीत वाढ करावी, आरोग्य सेवा मोफत द्यावी, गोरगरिबांना घरे आणि रस्त्यासाठी जमीन द्यावी, पदोन्नतीमधील मागासवर्गियांचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी, गायरान-जमीन धारकांना व अशा जमीनी कसणाऱ्यांना त्यांच्या नावे सातबारा देण्यात यावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मिलिंद मोकळे, शहराध्यक्ष सुनील खरात, जगन साळवे, राजू त्रिभुवन, मीनाक्षी शिरसाठ, मंगला पंदीकर, जिल्हाध्यक्षा वर्षा वर्धे, ज्ञानेश्वर घोरपडे, पंडित राठोड आदींचा यावेळी सहभाग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्यावरील भाषणात देशाला हिंदुस्थान संबोधून संविधानाचा अनादर केला आहे, त्यांच्याविरुद्ध देशद्रोह व इतर योग्य त्या कलमान्वये कार्यवाही करावी, या मागणीसाठी अॅड. रमा काळे यांनी उपोषण केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट