पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात असलेल्या मराठवाड्यात आता वरुणराजाने अतिवृष्टीची मालिका सुरू केली आहे. मंगळवारी (२९ ऑगस्ट) सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २१ मंडळांत अतिवृष्टी झाली.
यामध्ये जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव (८५ मिलिमीटर), जालना ग्रामीण (९४ मिमी) सातोना (१३२ मिमी), श्रीष्टी (१५७ मिमी), मंठा (७० मिमी), ढोकसाल (७४ मिमी), तळणी (७० मिमी), अंबड (७०मिमी), सुखापुरी (७५ मिमी), घनसावंगी (८७ मिमी), राणी उंचेगाव (६५ मिमी), परभणी जिल्ह्यातील देवुळगाव (६५ मिमी), वालूर (७८ मिमी), हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (६५ मिमी), लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद (७८ मिमी), उस्मानाबाद जिल्ह्यातील सावरगाव (६७ मिमी), नळदुर्ग (७० मिमी), मंगरुळ (९८ मिमी), उमरगा (७५ मिमी), डाळींब (८४ मिमी), जेवळी (८४ मिमी) या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
दीड महिना गायब असलेल्या पावसाने अवघ्या दोन आठवड्यांत मराठवाड्यात दमदार पुनरागमन केले असून बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांना पावसाने झोडपले आहे. विभागात मंगळवारी सकाळपर्यंत पावसाने सर्व तालुक्यांमध्ये हजेरी लावली. मराठवाड्यात मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत एकूण २०.२७ मिलिमीटर पाऊस झाला असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४.५२, जालना ३५.२५, परभणी २३.८२, हिंगोली २३.८०, नांदेड १३.११, बीड १९.३६, लातूर ११.१८, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३१.२४ मिलिमीटर पाऊस झाला.
लातूरमध्ये दमदार पाऊस
लातूर जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी दुपारनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. सांयकाळी ही पावसाची रिमझिम सुरुच होती. आकाश ढगांनी भरून आलेले असल्यामुळे मंगळवारच्या रात्रीही पाऊस मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चाकूर, उदगीर, देवणी, निलंगा, औसा, रेणापूर या ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरवात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पाउस झाला. देवणी येथे यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाउस पडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. रेणापूरातही जोरदार पाउस पडत असल्यामुळे शेतातूनही पाणी वाहत असल्याची माहिती राजू धर्माधिकारी यांनी दिली. लातुरात दुपारी एक वाजेपर्यंत निरभ्र वातावरण होते. दुपारनंतर आकाशात पावसाळी ढग जमा होण्यास सुरुवात झाली आणि सरीवर सरी बरसू लागल्या. बुधवारी महालक्ष्मीच्या भोजन पुजेसाठी भाज्या खरेदी करण्याकरीता, तसेच केळीचे पाने, फुलांच्या खरेदीसाठी गंजगोलाई, दयानंद गेट परिसरात महिलांनी गर्दी केली होती. मात्र, पावसाळी या ठिकाणी भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांची मोठी तारांबळ उडाली.
लातुरात मंगळवारी सकाळी आठपर्यंत वार्षिक सरासरीच्या ६३ टक्के पाऊस झाला आहे. मंगळवारच्या पावसामुळे सरासरीत वाढ होणार असून परतीचा पाउस असाच झाला तर वार्षीक सरासरी ही गाठण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ६५ टक्के पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असून आतापर्यंत सरासरीच्या ६५ टक्के इतका पाऊस झाला आहे. मात्र, हा पाऊस जिल्ह्यातील जलसाठा वाढण्यासाठी अपुराच आहे. जिल्ह्यातील जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची निंरंत गरज आहे.
गेल्या ४८ तासांत झालेल्या रिमझिम पावसाने जिल्ह्यातील नद्या-नाले ओसंडून वाहत असून या पावसामुळे खरिपाच्या तूर, कापूस, ऊस व फळबागा यांना फायदा होणार आहे. शिवाय या पावसाचा फायदा रब्बी पिकांना होईल. जुलैअखेरीस उस्मानाबाद जिल्ह्यातील २१९ प्रकल्पांत उपयुक्त जलसाठा १६ टक्के इतका होता तो या पावसाने वाढून २१ टक्क्यापर्यंत पाहोचला आहे . जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात सध्या २ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा असून अन्य १७ मध्यम प्रकल्पात २८ टक्के, तर २०१ लघुप्रकल्पांत २१ टक्के इतका जलसाठा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ६१४ मिमी इतका पाऊस उस्मानाबाद तालुक्यात झाला असून तो वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के इतका आहे.
नांदेड शहरात रिपरिप
जिल्ह्यात मंगळवार २९ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १३.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात एकूण २०९.८३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५०१.१९ मिमी. पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीनुसार आतापर्यंत ५२.४५ टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ पर्यंत नांदेडमध्ये १२.२५ मिमी., मुदखेडमध्ये २०.३३ मिमी.इतका पाऊस झाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट