महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलावे यासाठी शासनाने ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, या योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील कामांचा वेग मंदावला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत योजनेअंतर्गत उद्दीष्ट असलेल्या ३१ हजार कामांपैकी केवळ १५६७ कामे पूर्ण झाली आहेत.
गाव समृद्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने मनरेगा अंतर्गत योजनेच्या कार्यपद्धतीत बदल करून या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची ११ कामे प्राधान्याने राबविण्यात येत आहेत. यामध्ये अहिल्यादेवी सिंचन विहिरी, अमृतकुंड शेततळे, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटिका, नंदनवन वृक्षलागवड व समृद्ध ग्राम योजनेचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात या ११ कलमी योजनेअंतर्गत तब्बल ३१ हजार ६०२ कामे करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, आतापर्यंत केवळ २२ हजार ७१५ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून केवळ १५६७ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर यातील १४ हजार १२६ कामे सुरू आहेत. ८ हजार १८० कामे मंजूर असताना या कामांचा श्रीगणेशाच झालेला नसल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.
केवळ ४९५ शौचालयांची कामे पूर्ण
राज्याच्या ग्रामीण भागात शौचालये नसल्याने नागरिकांना उघड्यावरच प्रातःविधी उरकावा लागतो. प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय उभारण्याचे नियोजन आहे. या योजनेसाठी निधी उपलब्ध नाही, असे सांगण्यात येते. मात्र, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत निर्मल शौचालय प्रकारामध्ये शौचालय बांधता येते. यासाठी जिल्ह्यात ४ हजार ६०० शौचालय बांधण्याचे टार्गेट आहे. मात्र, या योजनेअंतर्गत केवळ ४९५ शौचालयाची कामे पूर्ण झाली आहेत.
कार्यक्रमनिहाय स्थिती पुढीलप्रमाणेः कंसात उद्दिष्ट, कंसाबाहेर उद्दिष्टपूर्ती- अहिल्या देवी सिंचन विहीर (३४००) ३४५, अमृत कुंड शेततळे (३८००) ५२, भू संजीवनी व्हमी कंपोस्टिंग (२२००) ००, भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग (२२००) ०४, कल्पवृक्ष फळबाग (३५००) ००, निर्मल शौचालय (४६००) ४९५, निर्मल शोषखड्डे (५५००) १४१, समृद्ध गाव तलाव (३४००) ३८४, समृद्ध ग्राम योजना (३०००) ६४.
जिल्ह्यातील कामांची स्थिती
११ कलमी कामांची उद्दिष्ट ३१ हजार ६०२
लाभार्थ्यांची संख्या ३ लाख ७१ हजार २२५
प्रशासकीय मंजुरी २२ हजार ७१५
चालू कामे १४ हजार १२६
पूर्ण १ हजार ५६७
मंजूर मात्र न सुरू झालेली कामे ८ हजार १८०
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट