म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महापुरूष एका जातीचे नसतात. मानवी कल्याणासाठी सर्व भेदरेषा भेदून काम करतात म्हणून ते महापुरूष ठरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यास सामाजिक सलोखा निर्माण होईल. पुतळा उभारण्याला विरोध हा बाबासाहेबांविषयी असलेले कमालीचे अज्ञान आहे. हितसंबंध धोक्यात आल्यामुळे कुलगुरूंवर दबाव-दडपण आणण्याची दुष्प्रवृत्ती दोन्ही समाजांनी नाकारली पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी शुक्रवारी केले. ते विद्यापीठातील पुतळा वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला आहे. या निर्णयाला काही आंबेडकरवादी संघटनांनी विरोध केला आहे. तर काही संघटनांनी समर्थन केले आहे. सामाजिक तेढ टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिकांनी सामंजस्याची भूमिका मांडली आहे.
यावेळी डॉ. कांबळे म्हणाले, ‘विद्यापीठात शिवरायांचा पुतळा उभा करण्याला विरोध बाबासाहेबांविषयी असलेले कमालीचे अज्ञान आहे. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व भारतभर दृढ झाले. सत्याग्रहात महाड सत्याग्रह की जय या घोषणेबरोबर शिवाजी महाराज की जय, जीजामाता की जय अशा घोषणा होत्या. महाड परिषदनंतर दुसऱ्या दिवशी आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह रायगडावर शिवरायांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेले होते. १९३३मध्ये मुंबईत त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वावर जाहीर भाषण दिले होते. शिवरायांनी सर्व जातीधर्मातील पराक्रमी मावळ्यांना घेऊन स्थापन केलेल्या राज्याचा त्यांनी गौरव केला होता. शिवरायांनी १०३ पूर्वास्पृश्य महार गडकरी व किल्लेदार नेमले होते. विद्यापीठात पुतळा उभा केल्यास सामाजिक सलोखा निर्माण होईल. सामाजिक सौहार्द बिघडू नयेत अशा प्रयत्नांची गरज आहे,’ असे डॉ. कांबळे म्हणाले.
या पत्रकार परिषदेला दौलतराव मोरे, भीमसेन कांबळे, अमोल दांडगे, जयेश मोरे, सुदाम मगर, हेमंत मोरे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती-धर्मांचे प्रेरणास्थान आहेत. विद्यापीठात तातडीने शिवरायांचा पुतळा उभारावा अशी मागणी जय शिवराय जय भीमराय फाउंडेशनने केली आहे. याबाबत शिष्टमंडळाने उपायुक्त वर्षा ठाकूर यांना निवेदन दिले. यावेळी फाउंडेशनचे धनंजय देशमुख, आकाश नरवडे, राहुल पाटील, मयूर विधाते, संदेश पवार, अमित मोरे, पवन खडके, वैभव देशमुख, विकास खरात आदी उपस्थित होते.
राज्यपालांना आमदारांचे निवेदन
विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तात्काळ उभारण्यात यावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे केली आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारीत राजेशाहीत लोकशाही व्यवस्था निर्माम करणारा हा राजा जगभरातील प्रतिभावंतांचा प्रेरणास्रोत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध योग्य नाही, असे चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे. चार-दोन लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तात्काळ निर्णय घ्यावा, असे चव्हाण म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट