... ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं!
---
ती अशीच. तिच्या जन्माच्या वेळी पंजाब पेटलेलं. तेव्हा अमरजीत नावाचा एक निधड्या छातीचा कार्यकर्ता होता. त्यांच्या नावावरून तिच्या आबानं तिचं नाव ठेवलं. कॉलेजात असताना एकदाही तिनं जातीचा रकाना भरला नाही. त्यासाठी तिच्या लहानपणी तिचे आबा जसे भांडायचे, अगदी तसंच ती ही भांडायची. ती अशीचचय. चळवळीची धार तिच्या गाण्यालाय. आजच्या ‘अग्निपथ’मध्ये अमरजीत राम बाहेतीचा हा रोमांचक प्रवास...
---
मनोज कुलकर्णी
manoj.kulkarni@timesgroup.com
---
ती अशीचय. म्हणजे कशी, की तिला दगड गोळा करायला आवडतात. बाबाला आबा म्हणते. त्या आबाशी बोलताना अरे, माझा असं एकेरी संबोधन वापरते. तिची सुरुवात त्या आबापासून झाली. म्हणते, ‘मी गायला बसले की माझा आबा उगाचच या रूममधून त्या रूममध्ये फेऱ्या मारतो. लेकीचं गाणं आपसूक मनात साठवून घेतो. दिवसभर मग तेच गुणगुणत राहतो. मला माहितंय त्याला शास्त्रीय, उपशास्त्रीय गाणं आवडतं. अशा वेळी मीही तेच गाते. त्यामुळं त्याचा दिस तर आनंदाला लगडतोच, सोबत माझाही.’
अमरजीत राम बाहेती. शाहिरी, शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत, लोकगीते. सगळे प्रकार ती उत्तम हाताळते. या संगीत प्रवासाच्या आठवणी सांगतानाही अलबतच तिची सुरुवात गाण्यापासूनच असते. ती दुसरीत असतानाचा किस्सा. म्हणाली, ‘पाहुण्यांच्या घरी गेलेलो. तिथं हार्मोनियम ठेवलेली. मी घेतली. त्यावर ‘ही चाल तुरुतुरु’ हे गाणं वाजवलं. बरं त्यापूर्वी मी कधी पेटी पाहिलीही नव्हती. माझ्या बोटातली ही जादू पाहून सर्वांना आनंद झाला. त्या काकांनी ती पेटी मला भेट दिली. मग कोणतंही गाणं मी त्यावर सहज वाजवायचे. सिंथेसायझर, माऊथ ऑर्गन, बुलबुल, तरंग ही वाद्य मी घरातच शिकले. माझ्या मुकुंद मामाला गायनाची आवड. तशी आई उषानंही नांदेडला अण्णासाहेब गुंजकरांकडं शास्त्रीय संगीत शिकलेलं. सातवीला होते. तेव्हा गॅदरिंग उद्यावर आलेली. अन् ऐनवेळी सातवी ‘अ’च्या वर्गानं आम्ही बसवलेलं गाणं चोरलं. मग खुन्नस म्हणून आमच्या सातवी ‘ब’च्या तुकडीनं रातोरात दुसरं गाणं शोधलं. एका दिवसात बसवलं. विशेष म्हणजे या नव्या गाण्याला पहिला नंबर मिळाला. त्यावेळी माझ्या मैत्रिणींनी मला उचलून घेतलं. हा ‘अ’ विरुद्ध ‘ब’चा प्रसंग. त्या निरागसतेचं आजही हसू येतं.
माझा आबा. त्याचा आणि आईचा प्रेमविवाह. दोघंही बीडचे. बहिण मानसी. आमचं असं माहेरचं चौकोनी कुटुंब. आता लग्नानंतर पती समाधान इंगळे, त्याची आई (चंद्रभागा). तो व मी त्यांना बाई म्हणतो. नणंद जीजा काकडे, आणि त्याची भावंडं, असं मोठं कुटुंब. लहानपणापासून माझ्या घरात सामाजिक कार्यकर्त्यांचा राबता. आबानं समाजकार्य करता यावं यासाठी दोन नोकऱ्या सोडून शेवटी प्राध्यापकी पत्करलेली. सोबतीला त्याचे लढे, मोर्चे, आंदोलनं सतत सुरू असायचं. कॉम्रेड गोविंद पानसरेंपासून अनेक दिग्गज आमच्या घरी येऊन गेलेले. पानसरेकाकांना माझं गाणं खूप आवडायचं. सोपे शब्द, सहज रचनेची गाणी म्हण. अवघड लिहणं, म्हणणं सोप असतं. सोपं लिहणं, सोप म्हणणं सगळंच अवघड असतं, असं ते म्हणायचे.
आबा कधी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अजून कुठलंतरी कार्यालय यावर सतत मोर्चे न्यायचा. वंचितांचे, शोषितांचे प्रश्न वारंवार मांडायचा. अशा वेळी अधिकाऱ्यांना भेटायला आबांसह सगळे प्रमुख कार्यालयात जायचे. मग या आंदोलकांना सांभाळायचं काम आमच्यावर यायचं. त्यांनी काहीही गडबड करू नये, शांत राहावं यासाठी आबा मला त्यांच्यापुढं गाणी म्हणायला लावायचा. इथूनच जमावाला गाण्यानं कसं हाताळायचं हे शिकले. दुखः फोडणारे, वेदना मांडणारे शब्द अशा वेळी जवळचे वाटायचे. हातात फक्त डफ असायचा. तोंडी कधी सुरेश भट, कधी द. ना. गवाणकर, नारायण सुर्वे, ज्योती म्हापसेकर. तर कधी प्रेम धवन, इकबाल, साहीर.
‘बुरी है आग पेट की,
बुरे हैं दिल के दाग़ ये,
न दब सकेंगे, एक दिन
बनेंगे इन्क़लाब ये,
गिरेंगे जुल्म के महल,
बनेंगे फिर नवीन घर!
अगर कहीं है तो स्वर्ग
उतार ला ज़मीन पर!’
असे घणाघाती शब्द कानावर पडले की आंदोलकही चिडीचूप असायचे. त्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं बळ मिळायचं. हे खूप जवळून शिकले. अनुभवले. या गाण्यांनी मला अक्षरशः वेडं केलं. माझी ही आवड पाहूनच आईनं मला शास्त्रीय संगीत शिकवलं. बीएलाही संगीत होतं. सोबत विशारद केलं. एम संगीत झालं. आता पीएचडी करतेय. या सगळ्या प्रवासात राम विधाते, विजय देशमुख, आनंद पाटील, वैशाली देशमुख या गुरुवर्यांकडून भरभरून गाणं मिळालं. समाधान कविता, गाणी लिहितो. उत्तम सूत्रसंचालन करतो. हाडाचा कार्यकर्ताय. त्यामुळंच आमचं नातं जुळलं. लग्नानंतरही त्यानं माझं गाणं जपलंय. माझं गाणं ‘बाईं’नाही आवडतं. समाधनचं गाव असई (ता. भोकरदन, जि. जालना). त्याच्यासह त्याची तिन्ही भावंडं शाळेत जायची. त्याच्या बहिणीला शाळेत घातलेलं नव्हतं. तेव्हा समाधाननं शाळा सोडली. जीजाला शाळेत घातल्याशिवाय शिकणार नाही म्हणाला. तेव्हा बाईनं जीजाला शाळेत घातलं, पण तिचं शिक्षण काही पूर्ण झालं नाही. मी गावी गेले की घरातली सगळी मुलं सांभाळते. त्यांना ओळीत बसवून गाणी म्हणते. माझ्याकडं हेचं महत्त्वाचं काम असतं. असेच गावी गेले होते. मी मुलांसमोर गाणं सुरू केलं....
‘लाडकी ही मैनी म्हण,
आई शाळत घाल गं मला
लई वाटतं गं मैने मला
पण जाते मी मजुरीला
तू गेलीस शाळेत तर
कोण बघेल धाकल्याला
मैनी रडली धाईधाई
काय करू मी बाई
शिक्षणाची गाडी
धाडधाड घरावरून जाई
माझी मैनी घरातच राहिली
शिक्षणाची गाडी चालली’
गाणं संपलेलं होतं. बाईंचे डोळे पाण्यानं भरलेले. तिला ही तिचीच वेदना वाटली. आजही जीजाच्या शाळेचा प्रसंग आठवून ती आतून झुरत असते. मी कधी गेलेच सासरी तर आवर्जून ते गाणं म्हणायला लावते. माझ्यातल्या गाण्यानं अशी एकन एक माणसं माझ्याशी जोडली गेली. आता कधी बाई औरंगाबादला आल्या आणि माझा कार्यक्रम असला, की त्या हमखास माझ्या सोबत येतात. त्यांना आता चळवळ, पुरोगामी विचार व्यवस्थित समजावून सांगितल्यानं पटतायत. यापेक्षा गाण्याकडून आणि कलेकडून तरी अजून काय मोठ्या अपेक्षा. माणसाला सुंदर करणं. हे गाणं करतंय. माझी सहा वर्षांची मुलगी नभा. तिलाही गाणं आवडतं. तिचा सूर चांगलाय. तिला मी घरातच शिकवते. गाणं आता पुढच्या पिढीतही रुजतंय. एक जुना प्रसंग आठवतो. आबाचं असंच एक आंदोलन. बहुतेक जिल्हा परिषदेच्या मैदानवर होतं. महिलांचा मोठा मोर्चा होता. हजारोच्या घरात गर्दी. आबा नेहमीप्रमाणं अधिकाऱ्यांना भेटायला गेला. मी नेहमीप्रमाणं डफ काढला. त्यावर हात पडला. आयाबाया कानात प्राण आणून ऐकत होत्या.’ हे सांगताना अमरजीतनं आवाज चढवला. आता डफ नव्हता की काही नाही. तिचे शब्द अंगार होऊन कोसळत होते...
‘या तुरुंगाच्या भिंती-भिंतीमधून
हाय लेकीसुनांना चिणल्यालं
अन् पिळणाऱ्या कायद्याचं धागं
घेऊन जाळं गुलामगिरीचं विणल्यालं
या जाळ्यात अडकून,
दबल्या मनानं आता
मरत राह्याचं न्हाय गं
या देशाच्या बायांना, आया-बहिणींना
सांगाया जायाचं हाय गं
एकी करून आणि लढा पुकारून
ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं...’
बसल्या क्षणी या शब्दांनी सुन्न केलेलं. तिनचं ही कोंडी फोडली. पुढं म्हणाली, ‘गाणं संपलं. तेव्हा आंदोलकांतली एक आजीबाई तरातरा माझ्याकडं आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवला. काही कळायच्या आत खाली वाकली आणि पाया पडू लागली. मलाच कसं तरी झालेलं. ‘तुझ्यात देव दिसला माय,’ तिच्या शब्दांनी आत हेलावलं. तिची कशीबशी समजूत काढली. तिच्या आठवणींच्या पावलांचे ठसे आजही मनात रेंगाळत राहतात. गाण्यानं असं भरपूर दिलंय.’ अमरजीतसोबतच्या गप्पा संपल्या. शब्दांचे चिखलठसे असे मागे सोडून.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट