विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनात पोलिस, महापालिका आणि महासंघ फेल ठरले. वेळेअभावी कला सादरीकरणाला संधी न मिळाल्याने संतापलेल्या गणेश मंडळांनी सिटी चौकात ढोल फोडत निषेध व्यक्त केला. निवडक गणेश मंडळांनाच आपला कलाप्रकार सादर करण्याची संधी दिल्याचा आरोप मंडळांनी केला.
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी दोन-तीन महिन्यांपासून गणेश मंडळांतील ढोलताशा, लेझिम, पावली पथकांनी सराव केला. त्यासाठी लाखों रुपयांचा खर्च झाला. परंतु विसर्जन मिरवणुकीतील नियोजनात प्रशासन कमी पडल्याने अनेक मंडळांचा भ्रमनिरास झाला. सिटी चौकात आपल्या मंडळाचा कलाप्रकार सादर करता यावा या हेतूने मंडळांची धडपड असते. श्री संस्थांन गणपती मंदिरपासून मुख्य मिरवणूक निघते. ही मिरवणूक सिटी चौकात येथे जुना बाजार रस्त्याने येणारे गणेश मंडळे सिटीचौकात मुख्य मिरवणुकीस सहभागी होतात. सिटी चौकात सादरीकरणासाठी प्रत्येकाला ठराविक वेळ दिला जातो, परंतु त्याचे पालन न झाल्याने यंदा पुरता गोंधळ उडाला. मिरवणूक लवकर लवकर पुढे काढा असे मंडळ मागणी करत होते, मात्र पोलिस प्रशासन, महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना ते जमले नाही. रात्री ११ वाजेपर्यंत सिटी चौकातून केवळ २२ गणपती मंडळच पुढे गेल्याचा आकडा होता. सादरीकरणास संधी मिळत नसल्याने गणेश मंडळ संतापले. निवडक गणेश मंडळांनाच अधिकचा वेळ दिला जात असल्याचा आरोपही केला. दरम्यान, सादरीकरणाला संधी मिळाली नसल्याचा निषेध अनेक मंडळांनी केला. भवानीनगरच्या धर्मसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी चौकात ढोल फोडून निषेध व्यक्त केला. पोलिस प्रशासन, महापालिका आणि गणेश महासंघांचा निषेध केला. दुपारी एक वाजता शहागंज मधून मिरवणुकीत गणेश मंडळ सहभागी झाले. सिटी चौकात मंडळास येण्यास रात्री ११.५० वाजले. सादरीकरणासाठी पथकाला वेळ न मिळाल्याने संतापलेल्या मंडळाच्या पदाधिकारी चौकात ठिय्या मांडून बसले. पदाधिकाऱ्यांनी ढोल फोडत नियोजनातील गोंधळाबाबत निषेध व्यक्त केला. महासंघातील पदाधिकारीही उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली.
१२ नंतरही शहागंजपर्यंत रांगा
दुपारपासून शहागंजपासून मंडळांनी आपापल्या वाहनांच्या रांगा लावल्या होत्या, मात्र रात्री १२ पर्यंतही या मंडळांना सिटीचौक येथे पहिल्या सादरीकरणाला संधी मिळाली नाही. १२ नंतर वाद्य वाद्य वाजवण्याची मुदत संपल्यानंतर सराफा, सिटीचौक रस्त्यावर भवानीनगरचा राजा, शिवसेना गणेश मंडळ, वीरभद्र क्रीडा मंडळ, तरुण गणेश मंडळ, पडेगावचा राजा, कासारीबाजार गणेश मंडळ, अखिल सुवर्णकार गणेश मंडळ, सार्वनिक गणेश मंडळ, आझाद हिंद गणेश मंडळ रस्त्यावरच होती. शहागंज - सराफा तसेच जुनाबाजार या दोन रस्त्यांवरून विविध मंडळांची वाहने सिटीचौकात येत होती, मात्र काही वाहने रंगारगल्ली तसेच मछलीखडक येथुनही विसर्जन मार्गावर आणण्यात आली त्यामुळे एकच कोंडी झाली.
गाडी पुढे नेण्यापुढे वाद
विसर्जन मिरवणुकीत गाढी पुढे नेण्यावरून वाद झाला. गणेश मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याने काहीवेळ सिटी चौकात तणावही निर्माण झाला. पदमपुरा- सावता गणेश मंडळ, जनसेवा, जय राणा गणेश मंडळातील कार्यकर्त्यात बोलाचाली झाली. मिरवणुकीस विलंब होत असल्याने गणेश मंडळातील कार्यकर्ते संतापलेले होते. पोलिस प्रशासनही बघ्याची भूमिकेत होते. १० वाजल्यानंतर महासंघांचे पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. केवळ माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या व्यतीरिक्त एकही नेता नाराज मंडळाची मनधरणी करण्यास उपस्थित नव्हता.
संधीच मिळाली नाही
धर्मसंग्राम गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन जाधव म्हणाले, ‘सादरीकरणाचा वेळ पाळली न गेल्याने आमच्या सारख्या मोठ्या आठ ते दहा गणेश मंडळांना सादरीकरणाची संधीच मिळाली नाही. निवडकच मंडळे सादरीकरण करत असतील तर, विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहरवासींयानाही बरे वाटणार नाही. आम्ही दोन-दोन महिन्यांपासून तयारी करतो. त्यात मुख्य ठिकाणी सादरीकरणाची संधीच मिळत नसेल तर काय अर्थ.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट