‘मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पू्र्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून मार्च २०१९ पर्यंत मोठे प्रकल्प पूर्ण होतील. या प्रकल्पांसाठी चार हजार ८०० कोटी रूपये उभे करण्यात येणार आहेत. विशेष तरतूद करण्याचा विचार करीत आहोत’ अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सिंचन भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पैठण येथील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी महाजन यांनी सपत्नीक जलपूजन केले. या दौऱ्यानंतर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सिंचन विभागाच्या नवीन प्रस्तावांची माहिती दिली. ‘जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतर कालवे दुरूस्तीचा मुद्दा समोर आला आहे. मागील अनेक वर्षे कालवे दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. राज्यात धरणे झाली, पण सिंचन व्यवस्था नाही. गोदावरी जल आराखडा तयार झाल्यानंतर इतर आराखडे चार महिन्यात तयार करण्याचे उद्दिष्ट आहे’ असे महाजन यांनी सांगितले. मराठवाड्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. राज्यपालांची परवानगी घेऊन विशेष निधी उभा केला जाईल असे महाजन म्हणाले. कालव्यात पाणी सोडण्याच्या बैठकीचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रात संवेदनशील होतो. अनेक नेते हातघाईवर येतात असे महाजन यांनी नमूद केले.
पाणी वाटप पद्धत बदलणार
‘सध्या कालव्याने सिंचनासाठी पाणी दिले जात असले तरी शेवटच्या टोकापर्यंत जेमतेम पाणी पोहचते. खुल्या पद्धतीने पाणी देण्याची पद्धत बदलून पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा धोरणात्मक निर्णय कॅबिनेटमध्ये घेणार आहोत. या नियोजनामुळे ४० टक्के पाणी बचत होईल. गळती, तूट याच्यावर मात करण्यासाठी बंदिस्त पाणी पद्धती गरजेची आहे’ असे महाजन यांनी सांगितले. राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. पाच प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून आकडेवारी मोठी असल्यामुळे उशीर लागत असल्याचे महाजन म्हणाले.
वाद होणार नाहीत
जायकवाडी धरणाला शास्वत पाणी मिळावे व धरणात नेहमी समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध राहावा, यासाठी राज्यशासन नदीजोड सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार आहे. यामुळे भविष्यात नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाण्यावरून वाद होणार नाही, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पैठण येथे बोलताना केला. जलसंपदा मंत्री महाजन यांनी गुरुवारी धरणातील पाण्याचे सपत्निक पूजन केले. यावेळी जायकवाडी धरणावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील बहुतांश प्रकल्पामध्ये चांगला पाणीसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी विक्रमी पाणीपट्टी जमा झाली आहे, असे त्यांनी सांगितले. जलपूजनावेळी आमदार संदीपान भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता तांदळे, अधीक्षक अभियंता स्वामी, कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड, भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, विजय चाटुपळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट