नहर-ए-अंबरी व नहर-ए-पाणचक्की अवमान याचिकेत महापालिकेने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागवून घेतला आहे. महापालिकेला आठ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करावे लागणार आहे.
काझी युसूफउद्दीन काझी फय्याज यांनी औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका केली आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याऐवजी विद्यमान आयुक्त डी. एम. मुगळीकर यांचे नाव प्रतिवादी म्हणून दाखल करण्यास औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली होती. शहरातील नहर-ए-अंबरी आणि नहर-ए-पाणचक्कीवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. लोकांनी अनेक ठिकाणी नहरी तोडल्या आहेत. परिणामी पाणचक्कीला कमी पाणीपुरवठा होतो आहे. वास्तविक या दोन्ही नहरी या पुरातत्वीय वारसा आहेत. त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले आहेत. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने स्वत:हून त्यांची दखल घेत ‘सुमोटो याचिका’ दाखल करून घेतली आहे. दोन्ही नहरींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासंदर्भात योजना आखण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. सुमोटो याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून प्रदीप देशमुख हे काम पाहत आहेत. काझी युसूफउद्दीन काझी फय्याज यांची बाजू रुपा दक्षिणी या तर पालिकेची बाजू अंजली दुबे -वाजपेयी यांनी मांडली.
वक्फ सीईओंना नोटीस
वक्फ बोर्डाचे सीईओ एस. सी. तडवी हे नव्याने रुजू झाले आहेत. त्यांना प्रतिवादी करण्याची मुभा खंडपीठाचे न्या. सुनील देशमुख व न्या. संगीतराव पाटील यांनी दिले आहेत. त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट