सोशल मीडियाच मुक्त वापर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शुभेच्छापत्रे देऊन मित्र परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा संपली आहे. सोशल मीडियाचे विनाखर्चिक माध्यम शेकडो मित्रांपर्यंत आकर्षक संदेश पोचवत असल्यामुळे शुभेच्छापत्रांची खरेदी थंडावली आहे. शुभेच्छापत्रे खरेदी करणारा मोजकाच वर्ग असल्यामुळे दोन वर्षांत शुभेच्छापत्र निर्मिती बंद होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या दिवाळीनिमित्त मोजकीच वैविध्यपूर्ण शुभेच्छापत्रे बाजारात उपलब्ध आहेत.
दिवाळी किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुण वर्गाकडून ‘ग्रिटींग कार्ड’ अर्थात शुभेच्छापत्रांना मोठी मागणी होती. प्रेयसी, शिक्षक, नातेवाईक, व्यावसायिक मित्र, वडीलधारी व्यक्ती अशा प्रत्येकासाठी वेगळी शुभेच्छापत्रे मिळतात. शुभेच्छापत्रे खरेदी करून उत्सवाचा आनंद घेणारा मोठा वर्ग होता. सुंदर काव्य रचना आणि चित्रांची सुसंगत मांडणी असलेली शुभेच्छापत्रे आकर्षक असत. मात्र, ‘एसएमसएस’ सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शुभेच्छापत्रांची मागणी घटली. फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर अशा सोशल मीडियाने शुभेच्छापत्रांचे बहुतेक ‘मार्केट’ संपवले. या माध्यमात स्वतः आकर्षक संदेश तयार करणे आणि पाठवणे उत्सुकतेचे ठरले आहे. औरंगाबाद शहरात निराला बाजार, औरंगपुरा, कॅनॉट प्लेस, उस्मानपुरा, सिडको भागात शुभेच्छापत्रांची किमान ३० ते ४० दुकाने होती. सद्यस्थितीत दुकानांची संख्या घटली असून व्यावसायिकांनी शुभेच्छापत्रांऐवजी भेटवस्तू विकण्यावर भर दिला आहे. शुभेच्छापत्रांना मागणी नसल्यामुळे ही गंभीर परिस्थिती ओढावल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
यंदाचे आकर्षण
थ्री-डी शुभेच्छापत्रे यंदाच्या दिवाळीचे आकर्षण आहे. रंगीबेरंगी आणि आकाराची शुभेच्छापत्रांना जेमतेम मागणी आहे. या शुभेच्छापत्रांची किंमत २५ ते २०० रुपये आहे. सोशल मीडियाच्या शुभेच्छा संदेशांच्या गर्दीत शुभेच्छापत्रे कमी झाली आहेत, असे व्यावसायिकांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट