टीम मटा, औरंगाबाद
ऐन दिवाळीच्या ‘मुहूर्त’ साधत एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचे परिणाम मराठवाड्याच्या सर्वच भागांमध्ये दिसून आले. एसटी कर्मचाऱ्यांचा या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, सर्वच बस स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत होता. मात्र, या संपामुळे सामान्य प्रवाशांचे बेसुमार हाल झाले. दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आणि अनेक जणांना अव्वाच्या सव्वा भाडे देत खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागला.
सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारबरोबरील चर्चा फिसकटल्यानंतर सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी संपाला सुरुवात झाली. बसस्थानकांमधून एकही एसटी बाहेर पडू न शकल्यामुळे रात्रीपासून अनेक प्रवासी बस स्थानकांच्या परिसरामध्ये अडकून
पडले होते.
जालन्यात १०० टक्के प्रतिसाद
जालना : जालना जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे, दररोज जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये सेवा देणारी एसटीची चाके थांबली होती.
या संपामुळे जालना, परतूर, अंबड, भोकरदन, जाफ्रराबाद, घनसावंगी, मंठा या प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी बस स्थानकावर शुकशुकाट पसरलेला आहे. जिल्ह्यामध्ये २७७ बसच्या माध्यमातून एसटीची सेवा असते.
यात एकूण ४५३ चालक, ४७८ वाहक, १९४ यांत्रिकी आणि १८८ प्रशासकीय असे एकूण १३१३ एसटी कर्मचारी आहेत. या सर्वच कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतला. या एसटीतून दररोज ७५ हजार किलोमीटरचा प्रवास होतो, तर प्रतिदिन १७ लाख रुपयांचा महसूल मिळत असतो, असे एसटी महामंडळाच्या
सुत्रांनी सांगितले.
खासगी वाहनांची ‘वसुली’
बीड : दिवाळीचा मुहूर्त साधून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा खाजगी वाहन चालक घेत असून, अडचणीतील प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल केले जात आहे.
या संपाला मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातील एकाही बसस्थानकातून एकही बस बाहेर पडली नाही. अनेक जणांना या संपाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकावर शेकडोंच्या संख्येने प्रवाशी अडकून पडले आहेत. या संपामुळे बसस्थानाकावर एकही बस उभी नसल्याने बसस्थानके सुनसान झाली आहेत, तर आगार मात्र हाउसफुल झाली आहेत. दरम्यान, संपामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा लाभ खासगी व्यावसायिक वाहतूकधारक घेत आहेत . एरवीच्या तिकिटाच्या दुप्पट तर काही वेळेस तिप्पट, चौपट तिकीट आकारले जात आहे. मात्र पैसे मोजून खासगी बसमध्ये उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर
आली आहे.
खासगी वाहनांत लटकून प्रवास
परभणी : एसटीच्या संपामुळे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. परभणीच्या बसस्थानकासह तालुका आणि ग्रामीण भागातील स्टँडवर आलेल्या प्रवाशांना खासगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागला. परिणामी, खासगी वाहतुकदार गाड्यांमध्ये अक्षरश: कोंबाकोंबी करून प्रवाशी भरल्याने हा प्रवास त्यांच्या जीवावर बेतला होता.
विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या अंतर्गत परभणी आगारासह पाथरी, जिंतूर, गंगाखेड आगारांतर्गत येणाऱ्या नऊ तालुक्यांतील स्थानकांमध्ये सर्व बस थांबून होत्या. यामध्ये सेलू बसस्थानकात एकूण १३७ फेऱ्या रद्द झाल्या. तर इतर तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात तेवढ्याच बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. यात सुमारे १२०० ते १३०० बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, सणासाठी गावाकडे येणारे विद्यार्थी, महिलावर्गाला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे, सर्व बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून आली. दुपारनंतर संप मिटेल आणि बस येईल, अशी अपेक्षा ठेवून अनेक प्रवाशी सायंकाळपर्यंत बसस्थानकात ठाण मांडून होते. गडबडीच्या प्रवाशांनी खासगी वाहतुकदारांचा सहारा घेतला. परभणी शहरातून जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत महामार्गावर धावणाऱ्या जीप, टमटम आणि छोट्या ट्रॅव्हल्समधून प्रवाशांची अक्षरश: कोंबाकोंबी झाली. अनेक प्रवाशांनी लटकून प्रवास केल्याचे चित्र दिसून आले. एकूणच एसटीच्या संपामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला.
ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल
लातूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना अतिशय हाल सहन करावे लागले. या संपाची माहिती नसल्यामुळे जवळच्या गावी नोकरी करणाऱ्या नोकरदारांचे अतिशय
हाल झाले. मध्यरात्री संपाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागात पहिल्या एसटीने गावा-गावात जाणाऱ्या वर्तमानपत्राच्या पार्सलचे गठ्ठेही पडून राहिले. त्यामुळे आज अनेक गावात शहरातून जाणारे वर्तमानपत्राचे अंक पोहोचू शकले नाहीत. पुुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी जाणाऱ्या खासगी बसेसचे दर अगोदरच दिवाळी म्हणून वाढले होते. त्यांच्याकडून संपाचा फायदा घेत, प्रवासीभाडे वाढविले होते. जिल्ह्यामध्ये पूर्वी १८ सीटर लहान गाड्या चालत असत. त्या गाड्याही आता बंद झाल्यामुळे तालुका ते जिल्हा ठिकाण अशी वाहतूक ठप्प झाली आहे. काळ्या-पिवळ्या जीपचालकांनी मात्र नेहमीप्रमाणे भाडे घेण्याचा प्रकार दुपारपर्यंत सुरू होता. खासगी वाहनधारकांकडून लातूर-पुणे भाडे १२०० ते १५००, लातूर-मुंबई भाडे १५००-१८०० आणि औरंगाबादसाठी चारशे ते पाचशे रुपये भाडे आकारले जात आहे. नियोजनपूर्वक प्रवास करणाऱ्यांपेक्षा ऐनवेळी सुट्टी मिळाली, प्रवासाला जाण्याचे निश्चित झाले, अशा प्रवाशांचे अधिक हाल होत आहेत, याकडे बसमालक लक्ष वेधत आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये प्रवासी त्रस्त
नांदेड : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांनाही बसला. या संपामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील एसटी वाहतूक थंडावली असून, सकाळपासून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
दिवाळीमुळे अनेक जणांनी गावाकडे जाण्याचे नियोजन केले होते. त्यातील अनेकांना संपाची माहितीच नव्हती. त्यामुळे, मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांमधील गोंधळ दिसून येत होता. बहुतेक स्थानकांवरून एकही गाडी बाहेर जात नव्हती. खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली असली, तरीही त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करण्यात येत होते. त्यामुळे, अनेक प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला.
उस्मानाबादमध्ये भाविकांनाही फटका
उस्मानाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला. त्याचबरोबर तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचेही या संपामुळे हाल झाले.
या संपात उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यातील एकाही डेपोतून एकही बस रस्त्यावर धावली नाही. या संपाचा फटका तुळजापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील बसला. या संपाचा नेमका फायदा खासगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना झाला. शिवाय प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी चढे दर करून प्रवाशांना लुटले. एस टी कर्मचाऱ्यांनी हा संप अवेळी केला असून, यामुळे त्यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
प्रवाशाना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही हालचाल केल्याचे दिसून आले नाही. पोलिस विभागांनी मात्र बस स्टँडवर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. जिल्ह्यातील उस्मानाबादसह तुळजापूर, कळंब, उमरगा, भूम, परांडा या प्रमुख बस स्टँडमधून मंगळवारी एकही बस धावली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट