जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम तब्बल दीड तास उशीराने सुरू झाला, ऐन सणासुदीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळपासून बसलेल्या शेतकऱ्यांचा घरी जाण्यासाठी खोळंबा झाला. मात्र याच वेळेत आमदार अब्दुल सत्तार यांनी नेत्यांना मारलेल्या कोपरखळ्यांनी सभागृहात हशा पिकला.
आमदार सत्तार यांनी, बाहुबली उशीराच येतात असे विधान केले. त्यावर मग कटप्पा कोण?, असे उपस्थितांपैकी एकाने विचारले. त्यावर कटप्पा त्यांच्यासोबतच आहेत आणि भल्लादेव मुंबईत असल्याचे उत्तर आमदार सत्तार यांनी देताच सभागृहात हशा पिकला. यावेळी उपस्थित नेत्यांनाही हसू आवरले नाही.कार्यक्रमाला उशीर झाल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता होती, यावर आमदार सत्तार म्हणाले, शेतकरी कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सकाळीच आले आहेत; आता अडीच वाजत आले. एक जेवण जिल्हाधिकाऱ्यांकडून, तर दुसरे जेवण आयुक्तांकडून मिळणार का, अशी विचारणा करताच पुन्हा हशा पिकला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वागतासाठी तुतारी, इतर वाद्य वाजवण्याची व्यवस्था होती. या वादकांनी दोन वेळेस वाद्य वाजवले पण, मान्यवर आलेच नसल्याने इतरांचे मनोरंजन झाले. या कार्यक्रमासाठी आमदार अब्दुल सत्तार, अतुल सावे, प्रशांत बंब यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, इतर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उपस्थिती होती.
दीड तास उशीर
पैठण, फुलंब्री, गंगापूर, सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्यातील २१ शेतकरी सकाळी ११ वाजेपासून उपस्थिती होती. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम एक वाजता सुरू होणार होता. मात्र पालकमंत्री दीड तास उशिराने आल्याने कार्यक्रम सव्वा दोन वाजता सुरू झाला. शेतकऱ्यांची अवस्था पाहून प्रास्ताविकात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम संपल्यावर भोजनाची व्यवस्था केल्याचे सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट