गंगापूर तालुक्यातील जामगाव, नवाबपूरवाडी, बगडी, ममदापूर, अगरकानडगाव या चार गावांतील तरुणांनी खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी गंगापूर तहसील कार्यालयावर सोमवारी (२३ ऑक्टोबर) मोर्चा काढला.
गंगापूर तालुक्यातील जामगाव परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. या दूरावस्थेकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कारखाना फाटा ते रघूनाथनगरमार्गे नेवरगाव, गंगापूर ते रघुनाथनगर, रघूनाथनगर ते वाहेगाव, गंगापूर ते नवाबपूरमार्गे बगडी या गावांकडे जाणारे रस्ते खराब स्थितीत आहे. रस्त्यांची पूर्ण चाळणी झालेली आहे. जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पायी चालणे देखील कठीण बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल रोष व्यक्त करीत या गावांतील तरुणांनी रस्त्यांचे डांबरीकरण तातडीने करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. रस्त्यांचे काम तत्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
खराब रस्त्यांमुळे रूग्णांना वेळेवर उपचार मिळणे शक्य होत नाही. मणक्यांचे आजार वाढले आहेत. विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तरूणांनी खराब झालेल्या रस्त्यांचे पोस्टर सोबत आणले होते. या आंदोलनात जामगाव, बगडी, ममदापूर, अगरकानडगाव, नेवरगाव, वाहेगाव येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावातीव युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट