म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हास्तरीय ग्रंथोत्सव भरवणे हा स्तुत्य उपक्रम आहे. यातून वाचक चळवळ वाढले, पण यापुढे वाचकोत्सवही सुरू करावेत. गावागावांतून यासंबंधी दवंडी पिटून तेथील ग्रंथालयात ही चळवळ रुजवावी. नागरिकांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करावे, असे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे नूतन कॉलनीजवळील समर्थनगर येथे असलेल्या शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात दोन दिवसांच्या ‘औरंगाबाद ग्रंथोत्सव-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक ना. वि. देशपांडे, ग्रामीण साहित्यीक धोंडिरामसिंह राजपूत, धर्मदाय आयुक्त श्रीकांत भोसले यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावडे व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बागडे म्हणाले, ‘लहान मुलांनी अवांतर वाचनावर भर द्यावा. शास्त्रज्ञ, लेखक, साहित्यिक व्हावे. यासाठी भरपूर वाचन, जनरल नॉलेज मिळवणे आवश्यक आहे.’ ‘उपस्थित असलेल्या कोणाकोणाला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव माहिती आहे,’ असे विचारून बागडे यांनी लहान मुलांची परीक्षा घेतली. ‘वाचनसंस्कृती, ग्रामीणसंस्कृती आणि सध्या बदलत चाललेल्या टीव्ही, इंटरनेटच्या युगात स्वत:ला सिद्ध करा,’ असे आवाहन केले.
प्राचार्य बोराडे यांनी, वाचनंस्कृती वाढावी यासाठी मी काही बक्षिस योजनाही सुरू केल्याचे सांगून आता बालकांसाठी लिखाण करत असल्याचे सांगितले. बाबा भांड, विश्वंभर गावंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोक गाडेकर यांनी प्रस्तावना केली. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.
लोकप्रतिनिधींची पाठ
ग्रंथोत्सवाच्या पत्रिकेत छापलेल्या व उपस्थित राहतील, असा उल्लेख केलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मात्र या ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवली. यात खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, महापौर, जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश होता. या ग्रंथोत्सवात २१ प्रकाशकांची दालने आहेत.
भजनीमंडळ आणि मुले
ग्रंथोत्सवाचे उदघाटन सकाळी १०.३० वाजता करण्यत आले. तत्पूर्वी ९ ते १० यावेळेत क्रांती चौक ते समर्थनगर ग्रंथोत्सव स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सामील झाले होते. त्यांच्याशिवाय शहरातील काही भजनीमंडळांनी सहभाग नोंदवला.
आज समारोप
शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दोन यावेळेत ‘ग्रंथाने मला काय दिले’ या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. दिलीप यार्दी अध्यक्षस्थानी असतील. यानंतर ग्रंथ वाचक गौरव, ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप होईल. दुपारी तीन ते चारदरम्यान काव्यवाचन होईल. रामदास गवळी अध्यक्षस्थानी असतील. समारोप कार्यक्रम सायंकाळी चार वाजता सुरू होईल, यावेळी अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल र. सु. ठाकूर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आदींची उपस्थिती असेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट