म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रसिद्ध नाटककार अरविंद जगताप यांनी शहरातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा मुद्दा मांडून महापालिका ‘भगवान भरोसे’ असल्याचे जाहीर कार्यक्रमात ठणकावून सांगितले. राज्यभरातील कलाकारांनी वेळोवेळी जाहीर वाभाडे काढल्यानंतरही मनपा प्रशासनाने नाट्यगृहांचे नूतनीकरण केले नाही. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मंगळवारी राउंड टेबल घेऊन या प्रश्नावर सविस्तर चर्चा घडवून आणली.
शहरातील संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम नाट्यगृहांची दुरवस्था असह्य झाली आहे. कलाकार आणि रसिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशांत दामले, चिन्मय मांडलेकर, सुयश टिळक, सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकारांनी नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर बोट ठेवले. नाट्यलेखक-गीतकार अरविंद जगताप यांनी नाट्यगृहांचा मुद्दा मांडत मनपाने लाज सोडल्याची परखड टीका केली. प्रथितयश कलाकारांनी मांडलेल्या मुद्यांकडे मनपाने लक्ष द्यावे, असे मत रंगकर्मींनी मांडले. संत एकनाथ रंगमंदिराच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्याची घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी १५ ऑगस्ट रोजी केली होती. ही घोषणा हवेतच विरल्यामुळे रसिक आणि रंगकर्मी संतप्त झाले आहेत.
संत एकनाथ रंगमंदिरात यावर्षी तीन नाटकांचे प्रयोग आयोजित केले होते. रंगमंदिराची प्रचंड दुरवस्था झाल्याचे यानिमित्त पहायला मिळाले. सोयीसुविधांच्या मुद्दा सातत्याने उपस्थित होऊनही महापालिका प्रशासन रंगमंदिराची दुरूस्ती करीत नाही हे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. संत एकनाथ रंगमंदिर व संत तुकाराम नाट्यगृहांचा नव्याने आराखडा तयार करावा. हौशी नाट्यसंस्थांना कमी दरात नाट्यगृह द्यावे आणि दोन नाटकांमधील वेळ वाढवावी. अगोदरचा कार्यक्रम लवकर संपत नसल्याने नंतरच्या कार्यक्रमाच्या संयोजकांना फार धावपळ करावी लागते. या शहरात सांस्कृतिक अधिकारी नसल्यामुळे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. प्रतिकात्मक आंदोलनातून महापालिकेचा निषेध नोंदवण्याची वेळ आली आहे. शहरातील खासगी नाट्यगृहे सुस्थितीत असताना मनपाची नाट्यगृहांची आबाळ का व्हावी याचे कोडे उलगडत नाही. आता नवीन पर्यायांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
- प्रकाश त्रिभुवन, ज्येष्ठ नाटककार
महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नाट्यगृहांकडे केलेले दुर्लक्ष हा कोडगेपणा आहे. सव्वा वर्षे तुम्ही महापौर होता की आम्ही होऊ या वादात शहर बकाल झाले. महापौर करंडक, राज्य-राष्ट्रीय स्तरावरील कलावंत यांचा सन्मान असे उपक्रम बंद पडले. किमान चांगल्या दर्जाचे नाट्यगृह देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. या सत्तासंघर्षात सांस्कृतिक क्षेत्राचे नुकसान नको. एखादा महोत्सव किंवा स्पर्धा घेतल्याशिवाय महापौर आणि नगरसेवकांना अडचणी कळणार नाहीत. सांस्कृतिक क्षेत्राला बळकटी देणाऱ्या घटकात नाट्यगृहे आहेत. त्यात फारसे अर्थकारण नसल्यामुळे कदाचित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना स्वारस्य वाटत नाही. मात्र, कलेची जाण असलेला दिलीप शिंदे यांच्यासारखा आयुक्त नाट्यगृहांची कशी देखभाल ठेवतो याचे अनुकरण सर्वांनी करणे आवश्यक आहे. ध्वनीव्यवस्थासुद्धा नाट्यगृहाने पुरवणे बंधनकारक असूनही रंगकर्मींची गैरसोय केली जाते.
- प्रा. डॉ. राजू सोनवणे, रंगकर्मी
वर्षभर सातत्याने सांस्कृतिक उपक्रम आयोजित करीत असल्यामुळे नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा वारंवार सामना करावा लागतो. संत एकनाथ रंगमंदिर मराठवाड्याच्या सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे. रंगकर्मींची ती शान आहे. पण, विकासात्मक दृष्टिकोन नसल्यामुळे त्याची वाईट अवस्था झाली. मंदिराला निधी देणारे खासदार कधीतरी रंगमंदिराला निधी देतील अशी अपेक्षा आहे. राज्यभरातील नावाजलेल्या कलाकारांनी औरंगाबाद शहरात येऊन जाहीर टीका केली. तरीसुद्धा मनपा प्रशासनाला जाग येत नसेल तर कलाकार, चित्रकार, साहित्यिक, पत्रकार यांनी एकत्रितपणे आंदोलन उभारणे गरजेचे आहे. या आंदोलनात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अभ्युदय परिवार सहभागी होईल.
- सुबोध जाधव, सरचिटणीस, नवमहाराष्ट्र युवा अभियान
माझ्या पिढीच्या रंगकर्मींची सुरूवात संत एकनाथ रंगमंदिरात नाट्य सादरीकरणाने झाली. सद्यस्थितीत त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. मनपा आयुक्त, खासदार, आमदार, नगरसेवक यांना निवेदने देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही. नामांकीत लोकप्रतिनिधींनी प्रतिकात्मक आंदोलन केल्यानंतरही कुणीच पुढाकार घेतला नाही. यावरून यांच्या मनोवृतीची सहज कल्पना करता येईल. पालकमंत्र्यांनी घोषित केलेल्या दोन कोटी रूपये निधीचे पुढे काय झाले, ते ठाऊक नाही. महिला कलाकारांनी नाटकात कामच करू नये अशी स्थिती आहे. घाणेरडे स्वच्छतागृह, खिडकीला काचा नसलेले ग्रीन रूम, फुटलेल्या फळ्यांचा रंगमंच या स्थितीत काम करणे शक्य नाही. मनपाला शरम वाटेल, असे आंदोलन साखळी पद्धतीने हाती घेणे गरजेचे आहे.
- प्रा. योगिता तळेकर-महाजन, रंगकर्मी
नाट्यगृहांची दुरवस्था हे मराठवाड्याच्या सांस्कृतिक क्षेत्राचे वस्त्रहरण आहे. राज्यातील कलाकारांनी नाट्य प्रयोगाला आल्यानंतर नाट्यगृहांचे जाहीर वाभाडे काढणे हा त्यांचा अपमान नाही, तर औरंगाबाद शहराचा अपमान आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या ग्रीक रंगभूमीचे अवशेष अजून अस्तित्वात आहेत. मात्र, सातत्याने नूतनीकरण करूनही नाट्यगृहे बकाल कशी होतात ? या परिस्थितीला नाकर्तेपणा जबाबदार आहे. नेत्यांची आश्वासने फक्त ‘बोलाचा भात अन् बोलाची कढी’ आहेत. आतासुद्धा नाट्यगृहांची अवस्था सुधारत नसल्यास कलाकार आंदोलन करतील. कलाकारांनी नेहमीच क्रांती केली आहे. शहरात गणेशोत्सवातसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम नसतात. इतका रूक्षपणा जपणारी ही एकमेव महापालिका असेल. फक्त नेत्यांच्या वाढदिवसाला नाटकाचा प्रयोग ठेवून गर्दी जमवतात. ही गर्दी खुर्च्यांचे नुकसान करते.
- प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे, नाट्यलेखक- दिग्दर्शक
‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारत असताना रस्ते आणि नाट्यगृहे यांची सारखीच अवस्था झाली आहे. या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही. कलाकारांनी मोठे आंदोलन हाती घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रश्न चव्हाट्यावर मांडणे आवश्यक आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असल्यामुळे नाट्यगृहांची गरज असते. सांस्कृतिक संपन्नता कोणत्याही शहरासाठी भूषणावह असते. मग औरंगाबाद शहरातच अशा उपक्रमांची मुस्कटदाबी कशासाठी. कृतीशील प्रयत्न झाल्यास नाट्यगृहांची दुरवस्था बदलू शकते. अन्यथा, हीच स्थिती कायम राहणार आहे. कलाकारांनी एकत्रितपणे जनआंदोलन उभारल्यास प्रशासनाला नमते घ्यावे लागेल. अशा आंदोलनासाठी हीच योग्य वेळ आहे.
- गणेश घुले, गीतकार
नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न वारंवार उपस्थित होऊनही सुटला नाही. नाट्यगृहांचे खासगीकरण करून प्रश्न सोडवण्याचा मुद्दासुद्धा काहींनी मांडला. मात्र, आर्थिक कुवत नसलेल्या हौशी नाट्यसंस्थांची परवड होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये. अटी घालून खासगीकरण झाले तरी अटी पाळल्या जातील याची खात्री नसते. आता एकूणच कला क्षेत्राबाबत उदासीनता वाढली आहे. इथली नाट्यगृहे तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था आणि तांत्रिक साधने नसतात. मग असे पोकळ वासे कशासाठी उभारले ? मनपा प्रशासनात कला क्षेत्राबद्दल आस्था नसणारे अधिकारी आहेत. लोकप्रतिनिधींना शहराच्या सांस्कृतिक प्रश्नाची जाण नाही. या पेचात शहराचे प्रचंड नुकसान झाले. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत.
- प्रा. डॉ. अशोक बंडगर, रंगकर्मी
रंगकर्मींचे सवाल
- पालकमंत्र्यांच्या दोन कोटी रुपये घोषित निधीचे काय झाले ?
- महापालिकेत सांस्कृतिक अधिकाऱ्याची नियुक्ती का रखडली ?
- आमदार-खासदार यांच्या आश्वासनांचे काय झाले ?
- सांस्कृतिक महोत्सव कधी सुरू करणार ?
- मनपाच्या अर्थसंकल्पातील सांस्कृतिक निधी कुठे वळवला ?
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट