येत्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर जवळपास एक लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पैठण येथे केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
काँग्रेसने पैठण येथे बुधवारी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यासभेत बोलताना अब्दुल सत्तार यांनी हा दावा केला. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्या विजयाचा दावा करणाऱ्या सत्तार यांनी, खोतकर काँग्रेसमध्ये येणार का, त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस पाठिंबा देणार का किंवा काँग्रेस आणि शिवसेना आगामी लोकसभा एकत्र लढवणार याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. सभेत सत्तार म्हणाले, ‘फडणवीस सरकार शतकऱ्याकडून सध्या वीज बिलाची जबरदस्तीने वसुली सुरू आहे. सरकारच्या विरोधात बोलाणाऱ्यांना, ‘तुमचा भुजबळ करून टाकू,’ अशा धमक्या देण्यात येत आहेत, मात्र आम्ही यांच्या धमक्याना घाबरणार नाहीत.’
आमदार सुभाष झांबड, माजी मंत्री अनिल पटेल, नामदेव पवार, विलास औताडे, श्रीराम महाजन, केशवराव तावडे, जगन्नाथ काळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद तांबे, शहराध्यक्ष जीतसिंग करकोटक यांनीही त्याच्या भाषणात भाजप सरकारवर टीका केली. जनआक्रोश सभेत मोठ्या संख्येने काँग्रस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
निवडणुकीपर्यंत केस ठेवणार नाही!
सध्याच्या शेतकरी विरोधी सरकारचा निशेष म्हणून मी मुंडण केले आहे. २०१९च्या निवडणुकीपर्यंत ‘केस लेस’ म्हणजेच डोक्यावर केस उगवू देणार नसल्याचे यावेळी सत्तार यांनी जाहीर केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट